मोदींच्या ‘त्या’ ट्विटला संजय राऊतांचं उत्तर; एकनाथ शिंदेंना टोला लगावताना म्हणाले, कष्टाचा वारसा आमच्याकडूनच मिळालाय!

Sanjay Raut on CM Eknath Shinde : कष्टाचा वारसा अमच्याकडूनच मिळालाय!; ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला

मोदींच्या त्या ट्विटला संजय राऊतांचं उत्तर; एकनाथ शिंदेंना टोला लगावताना म्हणाले, कष्टाचा वारसा आमच्याकडूनच मिळालाय!
आयेशा सय्यद | Updated on: Jul 24, 2023 | 11:15 AM

नवी दिल्ली | 24 जुलै 2023 : 22 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांचे कुटुंबियही उपस्थित होते. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीची माहिती दिली. त्यावेळी ही सदिच्छा भेट असल्याचं शिंदे म्हणाले. याचे फोटो एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर शेअर केले. शिंदेंचं ट्विट रिट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा. नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत ट्विट केलं.

एकनाथ शिंदे यांचं ट्विट रिट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. कष्टाचा वारसा अमच्याकडूनच मिळाला आहे. पंतप्रधानांनी त्याचं कौतुक केलं असेल तर ही चांगली गोष्ट आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

मणिपूर हिंसा थांबत नाहीयेत. पंतप्रधान यावर बोलत नाहीत. म्हणून संसदेचं अधिवेशन चालत नाहीये. तुम्ही जागतिक विषयावर बोलता पण तुम्ही देशातील विषयावर बोलत नाहीत. मणिपूर, मिझोराममधून लोकाचं पलायन सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहावं ही विरोधकांची मागणी आहे. संसदेच्या बाहेर केलेलं वक्तव्य आत करावं एवढीच विरोधकांची मागणी आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मणिपूरबद्दल न्यायालयावर भाजपचे लोक टीका करत आहेत. 10 वाजता आम्ही एकत्र जमून खरगे यांच्या चेंबरमध्ये बसून पुढची रणनीती ठरवू. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत ही गंभीर बाब आहे. राजीनामा घेतला असता तर हिंसेला ब्रेक लागला असता, असं म्हणत मणिपूरचा हिंसाचार आणि भाजपची भूमिका यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us