देशाचे कृषी मंत्री कोण हो… तोमर, तो मर..?; छगन भुजबळ यांची जीभ घसरली
फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेली. एअर बसचा प्रकल्पही गुजरातला गेला. मागच्या वर्षी 31 ऑक्टोबरला मी टाटाना पत्र दिले होते. तुम्ही हा प्रकल्प इथे आणा म्हणून त्यांना आवाहन केलं.
नाशिक: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांची नाशिक येथील एका कार्यक्रमात जीभ घसरली. देशाचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्याबद्दल उल्लेख करताना तो मर… असा उल्लेख भुजबळ यांनी केला. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. आम्हाला तर देशाचे कृषी मंत्री शरद पवारच (sharad pawar) आहेत, असं आजही वाटतं, असंही ते म्हणाले. यावेळी भुजबळ यांनी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची खिल्लीही उडवली.
स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळगाव बसवंत संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि., काकासाहेब नगर (रानवड)चा 40वा गळीत हंगाम शुभारंभ सुरू झाला. त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला संबोधित करताना भुजबळ यांनी हे विधान केलं. कृषी मंत्री कोण आपले… अब्दुल सत्तार… ते जिल्हाधिकाऱ्याला म्हणाले तू दारू पितो का? बरं देशाचे कृषी मंत्री कोण आहेत हो… (तोमर तोमर, लोकांमधून आवाज) तोमर… तो मर…मला माहीत नाही. तो मर… तो मर… अजूनही आम्हाला वाटतं शरद पवार साहेबच कृषी मंत्री आहेत, असं भुजबळ म्हणाले.
कुणाचाही अडचण असली की चला पवार साहेबांकडे. मग ऊस उत्पादक शेतकरी असो की इतर शेतकरी. सर्वजण पवारांकडे समस्या घेऊन येतात. पवार साहेबही या समस्या मार्गी लावतात. दिल्लीत जाऊन प्रश्न सोडवतात. दिल्लीत पवारांना कुणीही नकार देत नाही. राज्यच नव्हे तर देशाला पवारांची मोठी देणगी आहे, असं गौरवोद्गारही त्यांनी काढलं.
राजकारण आपल्या आपल्या ठिकाणी. निवडणुका येतील तेव्हा आपआपले झेंडे काढू. तोपर्यंत आपला झेंडा विकासाचा असला पाहिजे. शेतकरी आणि जनतेला त्रास होता कामा नये, असं आवाहनही भुजबळ यांनी मंचावरील उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांना केलं.
पूर्वी दादा भुसे काम करायचे कारण ते कृषी मंत्री होते. आता कोणतं ‘बंदर’ खातं दिल आहे. अरे कोणतं ‘बंदर’, असा टोलाही त्यांनी लगावला.
फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेली. एअर बसचा प्रकल्पही गुजरातला गेला. मागच्या वर्षी 31 ऑक्टोबरला मी टाटाना पत्र दिले होते. तुम्ही हा प्रकल्प इथे आणा म्हणून त्यांना आवाहन केलं. तेव्हाचे उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी देखील अनेक मीटिंग घेतल्या. अनेक प्रयत्न करूनही प्रकल्प गेला. आमच्या मुलांनी काम नाही करायचं तर काय हनुमान चालीसा वाचा, दहीहंडी फोडा एवढंच करायचं का? काही वेळेस मुख्यमंत्र्यांच्या शक्ती पेक्षा मोठ्या शक्ती असतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलायला पाहिजे, असं ते म्हणाले.