Jayant Patil : एकनाथ शिंदे इकडे या, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ; जयंत पाटलांची शिंदेंना विधानसभेतच ऑफर

| Updated on: Aug 24, 2022 | 11:08 PM

Jayant Patil : शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ही अनैसर्गिक युती होती असं बोलता. आमच्या बरोबर होता त्यावेळी असा शब्द काढला नाही. भाजपसोबत युती नैसर्गिक युती आणि आमच्या सोबत अनैसर्गिक युती हे कसं काय? निवडणुका झाल्यावर युत्या होतात.

Jayant Patil : एकनाथ शिंदे इकडे या, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ; जयंत पाटलांची शिंदेंना विधानसभेतच ऑफर
एकनाथ शिंदे इकडे या, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ; जयंत पाटलांची शिंदेंना विधानसभेतच ऑफर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मनावर दगड ठेवून मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना दिल्याचं विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. पाटील यांच्या या विधानाची राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खिल्ली उडवली. मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही इकडे या… या बाजूला. तुम्हाला मुख्यमंत्री करायला अडचण येणार नाही. तुमच्यातील गुण पाहता आमच्यातील कोणीही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देण्यास विरोध करणार नाही, अशी खोचक टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली. विधानसभा सभागृहातच जयंत पाटील यांनी शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने एकच खसखस पिकली. यावेळी पाटील यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करत चिमटेही काढले.

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ही अनैसर्गिक युती होती असं बोलता. आमच्या बरोबर होता त्यावेळी असा शब्द काढला नाही. भाजपसोबत युती नैसर्गिक युती आणि आमच्या सोबत अनैसर्गिक युती हे कसं काय? निवडणुका झाल्यावर युत्या होतात. परंतु आमची झाली ती अनैसर्गिक युती कशी काय? याआधीही बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताई यांना राष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांच्या वेळी पाठिंबा दिला होता. ज्यावेळी महाराष्ट्राला गरज होती तेव्हा शिवसेना सत्याच्या बाजूने उभी राहिली आहे, हेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

40 च्या 40 लोकांना मंत्री करा

तुम्ही तिकडे गेलात कधी तरी वातावरण बदलले तेव्हा इकडे याल. विस्तार होईल तेव्हा होईल. त्या विस्तारात कुणाला जागा मिळेल अथवा न मिळेल. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असंतुष्ट आत्मे आहेत. त्या 40 च्या 40 लोकांना मंत्री करा. तर तुमचं चांगलं होईल. आणि कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, असा टोलाही लगावला.

गोरे तेव्हा तुम्ही आमच्या बैठकीत होता

शिवसेना – भाजप नेत्यांमध्ये बंद खोलीत काय चर्चा झाली यावर बोलत असताना भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी तुम्ही त्या बैठकीत होतात का? अशी विचारणा केली. त्यावेळी जयंत पाटील यांनी गोरे तुम्ही त्यावेळी आमच्या बैठकीत होतात असा टोलाही लगावला.

शिवसैनिकांच्या वेदना दिसल्या नाही का?

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांची मध्यंतरी एक क्लीप आली होती. भाजपचा अन्याय सहन होत नाही असं बोलून राजीनामा देत आहोत असे शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. त्याच बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केले. तेव्हा एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांच्या वेदना दिसल्या नाही का? असा सवालही त्यांनी केला.

गुलाबराव पाटील ध्रुवतारा

खातेवाटपात काय झालं. चंद्रकांत पाटील यांच्यावर केवढा अन्याय. या मंत्रीमंडळात एकच ध्रुवतारा तो म्हणजे गुलाबराव पाटील. त्यांचे पाणी पुरवठा खाते कुणी बदलले नाही. शंभुराजे देसाई यांना एक्साईज खातं दिलं. ते खातं गणेश नाईक यांच्याकडे होते. त्यामुळे तुम्हाला ते चांगलं वाटणार नाही मंदाताई यांना चांगलं माहिती आहे, असंही ते म्हणाले.

हा महाराष्ट्राचा अपमान

एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. त्यावेळी एक फोटो आला होता. औरंगजेबाच्या दरबारात शेवटच्या रांगेत छत्रपती शिवाजी महाराजांना उभे करण्यात आले. तो अपमान समजून छत्रपती शिवाजी महाराज थेट निघून आले होते हे माहीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागच्या रांगेत उभे असलेले अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांनी बाहेर पडायला हवे होते, असा टोला लगावताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागच्या रांगेत का होतो याचा खुलासा करावा लागला.

तपास अधिकारी का बदलला?

शिवसेनेपासून हिंदूत्व लांब जाणार नाही. त्यामुळे हिंदू देवतांच्या जमिनी लुटणाऱ्या लोकांची चौकशी आम्ही लावली होती. परंतु या प्रकरणाचा तपास संपत आलेला असताना चौकशी अधिकारी का बदलण्यात आला? तुमच्या सहकार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? प्रामाणिकपणे चौकशी होत असताना अधिकार्‍यांना का बदलत आहात? असा सवालही त्यांनी सरकारला केला.