‘सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका’, एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तक्य

| Updated on: Apr 22, 2023 | 10:52 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाकडून राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार असल्याच्या चर्चा आहेत. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तक्य
Follow us on

जळगाव : राज्यातील सत्तासंर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या सत्तासंघर्षाचा निकाल काय लागतो यावर महाराष्ट्रातील आगामी काळातील राजकीय घडामोडी अवलंबून असण्याची दाट शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय. अजित पवार यांनी या चर्चांचं खंडन केलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“अजित पवार हे भाजपमध्ये जातील, असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. याबाबत त्यांनी याचा विचारही केला असावा. अजित दादांचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा ते अजित पवार हे भाजपसोबत गेले नव्हते ते राष्ट्रवादीतच होते”, असा एकनाथ खडसे म्हणाले.

“अजित पवार यांनी आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं म्हटलं आहे. आपण उपमुख्यमंत्री होऊन वर्ष-वर्ष आपण कष्ट करतोय. त्यामुळे त्यांनी आपण मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलंय. यात गैर काय?”, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. “एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणता आकड्याचा खेळ होता? हा तर खोक्यांचा खेळ जमला”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

एकनाथ खडसे यांचा मोठा दावा नेमका काय?

“सुप्रीम कोर्टाचा जजमेंट झाल्यानंतर नेमकं काय येतं हे मला माहिती नाही. मात्र यातील 16 आमदार हे अपात्र झाले. तर राजकारणातलं चित्र आणखी बदलू शकतो. जो 145 चा आकडा पूर्ण करेल तोच यानंतर मुख्यमंत्री होईल. कदाचित अजित दादा हे मुख्यमंत्री होण्याचा 145 चा आकडा जमवू शकतात. सध्या राजकारणात काही घडू शकतं. त्यामुळे पुढच्या कालखंडात या राज्याचे अजित पवार हे मुख्यमंत्री झाले असतील तर आश्चर्य वाटून घेऊ नका”, असं मोठं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आज भाजपवर गंभीर आरोप केले. आपण भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आपल्याविरोधात ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मी भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतर भोसरी जमिनीचं प्रकरण माझ्यामागे लावण्यात आलं. वास्तविक या जमिनीच्या प्रकरणात कुठलंही तथ्य नाही. या प्रकरणाशी माझाही काहीही संबंध नाही, असा अहवाल एसीपीने कोर्टात सादर केला होता. मी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्यामुळे जुना अहवाल बाहेर काढण्यात आला. त्या माध्यमातून माझ्यामागे ईडी लावण्यात आली”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.