पार्थ पवार तरुण, अनुभव कमी; ‘जय श्री राम’च्या भूमिकेवर नवाब मलिक यांची सारवासारव

| Updated on: Aug 10, 2020 | 3:10 PM

"राम मंदिर कोर्टाच्या निर्णयाने होत आहे. त्यात आक्षेप घ्यायचं कारण नाही" असं उत्तर नवाब मलिक यांनी दिलं आहे.

पार्थ पवार तरुण, अनुभव कमी; जय श्री रामच्या भूमिकेवर नवाब मलिक यांची सारवासारव
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला छेद देणाऱ्या भूमिका दोन वेळा घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मात्र वय आणि नवखेपणा ही कारणं पुढे करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मतभेदाच्या चर्चा उडवून लावल्या आहेत. (Nawab Malik Clarifies Parth Pawar stand on Ram Mandir and Sushant Singh Rajput Death CBI inquiry)

पार्थ पवार तरुण आहेत, नवीन आहेत, त्यांना अनुभव कमी आहे, त्यामुळे अशा गोष्टी घडतात. पण त्यामुळे काही मतभेद होणार नसल्याची प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

पहिली भूमिका

पार्थ पवार यांनी 27 जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे, असे ट्वीट पार्थ पवारांनी भेटीनंतर केले होते.

“सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची काही गरज नाही” असे नवाब मलिक यांनी आता सांगितले.

दुसरी भूमिका

“आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. मात्र त्यानंतर पार्थ पवारांनी भूमिपूजनाच्या दिवशी ‘जय श्रीराम’चा नारा देत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

त्यावर बोलताना “राम मंदिर कोर्टाच्या निर्णयाने होत आहे. त्यात आक्षेप घ्यायचं कारण नाही” असं उत्तर नवाब मलिक यांनी दिलं आहे.

कोण आहेत पार्थ पवार?

पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता. (Nawab Malik Clarifies Parth Pawar stand on Ram Mandir and Sushant Singh Rajput Death CBI inquiry)

हेही वाचा : राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, नवाब मलिक म्हणतात…

दरम्यान, भाजपमध्ये गेलेले नेतेच परतीच्या वाटेवर आहेत, असा दावाही नवाब मलिक यांनी केला. “हे सरकार पूर्ण काळ राहील. अजित पवार आणि शरद पवार यांना भाजपमध्ये गेलेले नेते भेटत आहे. लवकरच अशा नेत्यांबाबत निर्णय घेतला जाईल. इतके 50 आमदारांना राजीनामा देऊन सरकार पाडणं शक्य नाही” असेही नवाब मलिक म्हणाले.

“भाजप खासदार नारायण राणे आता भविष्यवाणी करणाऱ्या पक्षात गेले आहेत. पोपट बोलतात तसं ते बोलतात, मात्र ते बोलतील तसं चालणार नाही, पोपटपंची करुन राजकारण होत नाही” असा टोला नारायण राणे यांना मलिक यांनी लगावला. तीन पक्षात एकमत नसल्याने महाविकास आघाडी सरकार सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पडेल, असा दावा राणेंनी केला होता.

संबंधित बातम्या :

पार्थ पवार यांचे ‘जय श्री राम!’, अयोध्येतील राम मंदिर निर्माणाला पत्रातून शुभेच्छा

देशभावना समजून घ्या, पार्थ पवारांची थेट गृहमंत्री अनिल देशमुखांकडे मोठी मागणी

(Nawab Malik Clarifies Parth Pawar stand on Ram Mandir and Sushant Singh Rajput Death CBI inquiry)