Neelam Gorhe : ‘राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो’, नीलम गोऱ्हेंचा मोठा आरोप; भाजपवर जोरदार निशाणा

| Updated on: May 11, 2022 | 6:11 PM

राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो, असा दावाही नीलम गोऱ्हे यांनी केलाय. त्या आज सांगलीत बोलत होत्या. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपनं राज ठाकरे यांचा बळी घेतला असा गंभीर आरोप करण्यात आला होता.

Neelam Gorhe : राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो, नीलम गोऱ्हेंचा मोठा आरोप; भाजपवर जोरदार निशाणा
राज ठाकरे, नीलम गोऱ्हे
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात मोर्चा उघडला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका करत असले तरी भाजप विरोधात मात्र त्यांनी मौन पाळल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. इतकंच नाही तर राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केलाय. नीलम गोऱ्हे आज सांगलीत बोलत होत्या. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजपनं राज ठाकरे यांचा बळी घेतला असा गंभीर आरोप करण्यात आला होता.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो. राजकीय गेम म्हणजे त्यांच्यासोबत भाजप राजकीय कुरघोडी करू शकते. राज ठाकरे भाजपबद्दल अनुकूल भूमिका घेत आहेत. पण भाजप काम झाले की राज ठाकरे यांना वाऱ्यावर सोडेल. इसापनीतीची कथा अशीच आहे. आम्ही भाजपचा अनुभव घेतला आहे. भाजप त्यांनी तिकीट वाटपावेळी वाऱ्यावर सोडून देईल. कारण भाजपला उत्तर भारतीयांची मतं हवी असतात. त्यामुळे हा धडा त्यांना लक्षात येईल.

नवनीत राणा यांना ‘वार्ता रोग’!

खासदार नवनीत राणा यांच्यावरही नीलम गोऱ्हेंनी जोरदार टीका केली. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. नवनीत राणा यांना ‘वार्ता रोग’ झाला असावा, त्यामुळे त्या उठसुठ टीका करत आहेत. नवनीत राणा या उत्तम अभिनेत्या आहेत. जसे जसे डायलॉग त्यांना कुणी लिहून देईल तशा त्या बोलतात. एखाद्या नाटकात रंगमंच बदलले तर पात्र तेच असतात. तशीच परिस्थिती त्यांची आहे. केंद्रात सूत्रधार आणि डायरेक्ट तेच आहेत. फक्त दरवेळी पात्र बदलत असतात, ते म्हणजे राणा, राणे, सोमय्या असे. यांना स्क्रिप्ट लिहून देणारे मुंबई आणि दिल्लीत बसले आहेत, असा जोरदार टोला गोऱ्हे यांनी लगावलाय.

हे सुद्धा वाचा

‘मुंबई शिवसेनेची आहे आणि शिवसेना मुंबईची’

नवनीत राणा नवीन आहेत. लंका कुठे आहे, लंकेमध्ये काय चालले आहे. तिथे पंतप्रधानांच्या मागे लोक लागले आहेत. मुंबई शिवसेनेची आहे आणि शिवसेना मुंबईची आहे, ही काळ्या दगडावरची केशरी रेष आहे. राज ठाकरे नवनवीन प्रयोग करत असतात. मात्र त्यांचे आमदार निवडून येत नाहीत. त्यामुळे त्यांनी काहीही केले तरी लोकांच्या मनात राज ठाकरे यांना स्थान नाही. जे उद्धव ठाकरेंवर टीका करतील त्यांना उज्वला योजनेसारखं वाय सुरक्षा मिळते. त्यामुळे ती एक सुरक्षा योजना सुरू केली असावी, असा जोरदार टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय.