सर्वात मोठी बातमी ! शरद पवार यांनाच फोडण्याचा प्लॅन, अजित पवार यांचं बंड दिवाळीनंतर होणार होतं; ‘या’ कारणामुळे घाईत निर्णय

| Updated on: Jul 19, 2023 | 12:48 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. ही फूट आताच का पडली? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीला अवघं वर्ष बाकी असताना अजितदादा भाजपच्या वळचणीला का गेले? असा सवालही केला जात आहे.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार यांनाच फोडण्याचा प्लॅन, अजित पवार यांचं बंड दिवाळीनंतर होणार होतं; या कारणामुळे घाईत निर्णय
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. ही फूट आताच का पडली? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीला अवघं वर्ष बाकी असताना अजितदादा भाजपच्या वळचणीला का गेले? असा सवालही केला जात आहे. अजित पवार यांच्या बंडाचं नेमकं कारण आता समोर आलं आहे. अजित पवार हे दिवाळीनंतर बंड करणार होते. पण त्यांना आताच राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यास सांगितलं गेलं. त्यामुळे अजित पवार आणि त्यांचा गट घाईने भाजपच्या बाजूला गेल्याचं सांगितलं जात आहे. हे असं का झालं? त्याचं कारणही समोर आलं असून आहे.

अजित पवार यांचं बंड दिवाळीनंतर होणार होतं. पण ते वेळेआधीच करण्यात आलं. कारण राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडत होत्या. महाविकास आघाडीच्या राज्यात वज्रमूठ सभा सुरू होत्या. या सभांना मोठा प्रतिसाद मिळत होता. मविआला जनतेतून सहानुभूती होती. या सभा गर्दीच खेचत नव्हत्या तर त्याची चर्चाही सुरू होती. त्यामुळेच अजित पवार यांना वेळेआधी बंड करण्यास सांगण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. भाजप हायकमांड आणि संघाकडून दिवाळीनंतर अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय झाला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

म्हणून दोन दिवस पवारांची भेट

अजित पवार आणि त्यांचा गट सलग दोन दिवस शरद पवार यांच्या भेटीला गेला होता. आम्ही चूकलो, आम्हाला माफ करा, असं या गटाने शरद पवार यांना सांगितलं. शरद पवार आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असं अजित पवार यांच्या गटाकडून सांगण्यात आलं. मात्र, माफी मागणं किंवा राष्ट्रवादीतील फुटीचा तिढा सोडवणं हा या भेटीचा उद्देश नसल्याचं आता समोर आलं आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांना एनडीएत आणण्याचा यामागे प्लान होता. शरद पवार यांनी बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीला न जाता दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहावं म्हणून त्यांना आग्रह करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट शरद पवार यांना भेटायला गेला होता, अशी माहिती समोर येत आहे.

पवार ठाम

शरद पवार यांना एनडीएच्या बैठकीला येण्याचा अनऑफिशियल निमंत्रण देण्यात आलं होतं. तर पवार यांना एनडीएच्या बैठकीला आणण्याचा संपूर्ण प्लान अजित पवार गटाचा होता. त्यामुळेच शरद पवार यांची दोन दिवस मनधरणी करण्यात आली. आदल्या दिवशी मंत्र्यांनी विनंती केली. दुसऱ्या दिवशी आमदारांनी शरद पवार यांना विनंती केली. शरद पवार यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न होता. पण शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी नकार दिल्याने त्यांनी एनडीएच्या बैठकीला जाण्यास नकार दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.