‘आदित्य ठाकरेंवर दगडफेकीचा ड्रामा, खोटे बोलतोय म्हणून दगडी खातोय, उद्या चपला खाव्या लागतील’, निलेश राणेंचा हल्लाबोल!

| Updated on: Feb 08, 2023 | 3:24 PM

वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या समर्थकांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरेंवर दगडफेकीचा ड्रामा, खोटे बोलतोय म्हणून दगडी खातोय, उद्या चपला खाव्या लागतील, निलेश राणेंचा हल्लाबोल!
Image Credit source: social media
Follow us on

महेश सावंत, सिंधुदुर्गः औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वैजापूर येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. मात्र दगडफेकीचा हा केवळ ड्रामा होता, असा पलटवार निलेश राणे यांनी केला आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा हवी आहे, त्यासाठी हे नाटक रचण्यात आलंय, असाही ठपका राणे यांनी ठेवला आहे. आदित्य ठाकरे सगळीकडे जाऊन गद्दार, खोक्यांचे आरोप करत आहेत. असं खोटं बोलल्यामुळेच त्यांच्यावर दगडी खाण्याची वेळ आली आहे. आताच सुधारले नाहीत तर उद्या चपलाही खाव्या लागतील, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

सिंधुदुर्गात निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंसह अंबादास दानवेंवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे सारखा बोगस भंपक माणूस महाराष्ट्रात दुसरा नाही.दगडफेकीचा ड्रामा तयार केला.स्वतःच्याच लोकांना दगड मारायला लावले.स्वतःच झेड प्लस संरक्षण करायचं आहे म्हणून हे नाटक आहे, असा आरोप निलेश राणे यांनी केला.

अंबादास दानवेंनी राजीनामा द्यावा…

अंबादास दानवेच्या जिल्ह्यात त्यांचा नेता दगड खातो याची त्यांना लाज वाटायला पाहीजे.खरंतर राजीनामा दानवेंनी द्यायला हवा.वरून जर बाळासाहेब बघत असतील की आपला नातू दगडी खातोय तर वरून तुमच्यावर चप्पला फेकतील.आदित्य ठाकरे आता दगडी खातोयस, खोटं बोलायचं थांबव नाहीतर चपला खाशील, अशा इशारा निलेश राणे यांनी दिलाय.

औरंगाबाद पोलीसांचा मोठा खुलासा

दरम्यान, वैजापूर येथील दगडफेक प्रकरणात पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आलाय. आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली नव्हती, असा खुलासा औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी केला आहे. औरंगाबाद ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी हा खुलासा केला आहे.

रमेश बोरनारेंवर आरोप

वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या समर्थकांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. बोरनारे यांनी काही लोकांना पैसे देऊन या ठिकाणी सोडलं, त्यांनीच मग गोंधळ घातला असा थेट आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय. तर रमेश बोरनारे यांच्यात हिंमत नाही, ते असं करू शकत नाहीत. त्यांना मानणाऱ्या काहींनी हे कृत्य केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. औरंगाबाद पोलिसांनी मात्र ही दगडफेक झालीच नाही, असा खुलासा केला आहे