‘सारथीला मिळतील तेवढेच पैसे महाज्योतीला मिळणार, मी बसलोय इथे’, मंत्री विजय वडेट्टीवारांचा विश्वास

| Updated on: Jun 27, 2021 | 6:43 PM

जेवढे पैसे सारथी संस्थेला मिळतील तेवढेच पैसे महाज्योतीलाही मिळतील, मी बसलोय इथे, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी दिलाय. आमच्या खात्यात पैसे आले तर आम्ही ते परत जाऊ देणार नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले.

सारथीला मिळतील तेवढेच पैसे महाज्योतीला मिळणार, मी बसलोय इथे, मंत्री विजय वडेट्टीवारांचा विश्वास
विजय वडेट्टीवार, ओबीसी चिंतन बैठक
Follow us on

नागपूर : ओबीसी आरक्षणासाठी पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या चिंतन बैठकीत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. कोरोनाची लाट गेल्यावर ओबीसी समाजाचा पहिला विराट मोर्चा औरंगाबादेत होणार असल्याची घोषणा विजय वडेट्टीवारांनी केली आहे. जेवढे पैसे सारथी संस्थेला मिळतील तेवढेच पैसे महाज्योतीलाही मिळतील, मी बसलोय इथे, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी दिलाय. आमच्या खात्यात पैसे आले तर आम्ही ते परत जाऊ देणार नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले. (Vijay Wadettiwar claims that Mahajyoti will get the same amount of money as Sarathi Sanstha)

नागपुरात पार पडलेल्या ओबीसी चिंतन बैठकीत विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. महाराष्ट्रात तीन दिवस फिरलो तरी 25 लाखांची सभा होईल. सरकार झुकती है झुकानेवाला चाहिए, असं वडेट्टीवार म्हणाले. आपल्या मंत्रिपदावरुनही वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केलीय. ओबीसींची खातं मिळालं तेव्हा चपराशीही नव्हता. उधारीवर आणि समाज कल्याण विभागाच्या भरवशावर हे खातं चालवतो. काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं चूक झाली. विरोधी पक्षनेता होतो, ओबीसींची नेतृत्व करतो. वाटलं होतं महसूल खातं मिळेल पण भेटलं हे खातं. मी ओबीसी आहे ना, महसूल खातं का मिळेल? पंकजाताईंनाही ग्रामविकास खातंच मिळालं होतं, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी खंत व्यक्त केलीय.

निवडणूका झाल्यावर कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा आणि गरज भासल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अस आपण मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. माझं काय होईल ते होईल पण ओबीसीच्या मुद्द्यावर मी शांत बसणार नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी यावेळी दिलीय.

सारथी संस्थेला 1 हजार कोटी – संभाजीराजे

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणेला स्वायत्तता देण्यात आली असून 13 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सारथी संस्थेची 8 विभागीय कार्यालय होणार आहेत. पहिले कार्यालय कोल्हापूरला सुरु होणार आहे. 1 हजार कोटी आणि इतर मागण्यांसाठी 21 दिवसांचा वेळ लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

सारथी काय आहे ?

सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ही संस्था पुणे येथे कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून स्थापन केली होती.

सारथी स्थापन करण्याचा उद्देश काय ?

सारथी ची स्थापना मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी, या समुदायाला प्रशिक्षण मार्गदर्शन करण्यासाठी सारथीची स्थापना करण्यात आली.

महाज्योती म्हणजे काय?

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण शाश्वत विकासाकरीता “महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ ला करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकांतील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुखता वृध्दी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास , स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून आधुनिक कटिबद्ध समाज निर्मितीकरीता स्वतःस समर्पित करण्यास कटिबद्ध असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतं.

संबंधित बातम्या :

मी गोपीनाथ मुंडेंचा शिष्य, पंकजांना वडेट्टीवार म्हणतात, आपण गुरुबंधू, वाचा ओबीसी परिषदेत काय घडतंय?

ओबीसी चिंतन बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचं विचारमंथन, ओबीसी आरक्षणासाठीचे महत्वाचे ठराव, जाणून घ्या सविस्तर

Vijay Wadettiwar claims that Mahajyoti will get the same amount of money as Sarathi Sanstha