तिचा बुलंद आवाज, प्रचंड जनाधार, पण पाचवीला पूजलेला संघर्षच… का अधोरेखित होतोय?

| Updated on: Oct 04, 2022 | 2:30 PM

आज हिंदीत बनवण्यात आलेली ही डॉक्युमेंट्री आता राज्याबाहेरही अधिक व्हायरल होतेय. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या राजकीय संघर्षाच्या, सद्य स्थितीतील अडथळ्यांच्या कहाण्या, किस्से आणखी विविध पातळ्यांवर नव्याने चर्चिल्या जातील, अशीच चिन्ह आहेत.

तिचा बुलंद आवाज, प्रचंड जनाधार, पण पाचवीला पूजलेला संघर्षच... का अधोरेखित होतोय?
Image Credit source: social media
Follow us on

औरंगाबादः पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावललं जाणं हा राजकीय वर्तुळातला चर्चेचा विषय आणि तितकाच गूढ. कारण वारंवार अशा काही घटना घडतात, त्यातून त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसते. राजकीय चर्चांना उधाण येतं पण नंतर पंकजा मुंडे स्वतः यावर स्पष्टीकरण देतात. दसरा मेळाव्याच्या (Dussehra Melava) निमित्तानं शिवसेना, शिंदे गट, गर्दी, भगवा झेंडा, भगवे टी शर्ट, या लाटांनी आज महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतंय. यात बीडच्या भगवान भक्तीगडावर (Bhagwan Bhakti Gad) पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यानंही यंदा कात टाकल्याचं दिसून येतंय. भगवान गडावरील दसरा मेळाव्यावर यंदा खास डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विट केल्यानुसार, ही डॉक्युमेंट्री आय जिओ कंपनीने त्यांना भेट म्हणून दिली आहे. पण यातही पंकजा मुंडेंच्या राजकीय वाटचालीत, दसरा मेळाव्याच्या परंपेरत किती संघर्ष आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

पंकजांच्या या दसरा मेळाव्याला एक इतिहास आहे. मात्र इतिहास कधीच सरळ आणि सहज नसतो. संघर्ष, समर्पण आणि संयमाच्या लढाईतून त्याला जावंच लागलं, असं माहितीपटात म्हटलं गेलंय.

राष्ट्रसंत भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे आणि विराट जनसागर जमा करणाऱ्या दसरा मेळाव्याची महती दर्शवण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर दसरा मेळावा घेण्यास भगवान गडावरून रोखण्यात आलं.

2016 मध्येही पंकजा मुंडेंच्या भगवान गडावरील मेळाव्यास विरोध केला गेला. त्यावेळी लाखोंच्या जनसमुदायाला पंकजांनी कसं नियंत्रित केलं, हे त्यात दर्शवण्यात आलंय.

2017 मध्येही तेच घडलं. पण या वर्षी सावरगाव येथे दसरा मेळावा घ्यायचं ठरलं आणि सावरगावात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं…

अनेक विघ्नानंतरही पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सुरु आहे. पण मतांच्या राजकारणासाठीच पंकजा मुंडेंच्या वाटेत अडथळे आणले गेले का, असा सवाल पुन्हा या डॉक्युमेंट्रीत अधोरेखित करण्यात आलाय…

आज हिंदीत बनवण्यात आलेली ही डॉक्युमेंट्री आता राज्याबाहेरही अधिक व्हायरल होतेय. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या राजकीय संघर्षाच्या, सद्य स्थितीतील अडथळ्यांच्या कहाण्या, किस्से आणखी विविध पातळ्यांवर नव्याने चर्चिल्या जातील, अशीच चिन्ह आहेत.