‘व्यंगावर टीका करण्याची सुरुवात फडणवीसांनीच केली’, प्रकाश आंबेडकरांचा आरोप; केतकीची पोलीस कोठडी चुकीची असल्याचाही दावा

| Updated on: May 15, 2022 | 4:53 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही केतकीची पोस्ट चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र, व्यंगावर टीका करण्याची सुरुवात फडणवीस यांनीच केल्याचा गंभीर आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

व्यंगावर टीका करण्याची सुरुवात फडणवीसांनीच केली, प्रकाश आंबेडकरांचा आरोप; केतकीची पोलीस कोठडी चुकीची असल्याचाही दावा
प्रकाश आंबेडकर, केतकी चितळे, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली. तिच्या पोस्टनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केतकी चितळेचा (Ketaki Chitale) तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जातोय. तर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केतकी चितळेची पोस्ट चुकीची आणि निषेधार्ह असल्याचं म्हटलंय. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही केतकीची पोस्ट चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र, व्यंगावर टीका करण्याची सुरुवात फडणवीस यांनीच केल्याचा गंभीर आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केतकी चितळे यांनी जी टीका केली ती चुकीची आहे. यासंदर्भात ती पोस्ट आपलीच असल्याचं तिने मान्यही केलं आहे. शरद पवार यांना कॅन्सरसारखा आजार झाला होता. त्या आजारातून ते बरेही झाले. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर आणि मरणावर अशा प्रकारची टीका करणं योग्य नाही. अशा प्रवृत्ती समाजात वाढत आहेत. केतकीने ती पोस्ट आपलीच असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे तिच्या पोलीस कोठडीची मागणी करणं चुकीचं असल्याचंही आंबेडकर म्हणाले. हल्ली अशा विकृती वाढत चालल्या आहेत. व्यंगावर टीका करण्याची सुरुवात फडणवीस यांनीच केली. आता राजकीय आरोपांची पातळी खूप खालावली आहे, असंही आंबेडकर यांनी म्हटलंय. त्याचबरोबर महाविकास आघाडीचं सरकार भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पूर्णपणे अडकलं असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केलाय.

‘शासनाने केलेली कारवाई चुकीची’

केतकी चितळेच्या पोस्टबाबत विचारलं असता, राजकारणात टीका करण्यात काही गैर नाही. पण या टीकेत जो काही सार आहे तो शरद पवार यांच्या शरीरावर आहे. शरद पवार कॅन्सर रुग्ण होते. त्यातून ते बाहेर आले. त्यांनी दाखवून दिलं की आपण कॅन्सरविरोधात लढू शकतो. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर व्यंग करणं चुकीचं आहे. अशी टीका करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तो गुन्हा आहे असं मी मानतो. मात्र, शासनाने जी कारवाई केली ती चुकीची आहे. कोठडी कुणाकडून मागता? या ठिकाणी सरळ सरळ पुरावा आहे. फेसबूकवर पोस्ट आहे. कोर्टात पुरावा सादर केला असता तर शिक्षा सुनावली असती. जिकडे रिकव्हरी आणि डिस्कव्हरी असती तर पोलीस कोठडी ठीक आहे. पण जिडके सर्व स्पष्ट आहे तिकडे कोठडी का मागता? असा सवाल आंबेडकर यांनी केला.

हे सुद्धा वाचा

’15 – 20 दिवसांत निकाल लागला पाहिजे’

कोर्टाने लवकरात लवकर निर्णय द्यावा. शरीरावर व्यंग करणं हे कायद्याने गुन्हा आहे. शिक्षा झाली पाहिजे. फेसबुक वॉलवर आहे ते पोलीस कधीही तपासू शकतात आणि आरोपीही कबूल करत आहे. तर सरळ सरळ 15 – 20 दिवसांत निकाल लागला पाहिजे, अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली.