पहाटेचा शपथविधी; आणखी एक मोठा ट्विस्ट, शरद पवार यांच्यानंतर नरेंद्र मोदींचंही नाव, कुणी केला बडा दावा?

| Updated on: Feb 15, 2023 | 3:50 PM

शपथविधीत आतापर्यंत शरद पवार यांचं नाव चर्चेत होतं. आता तर शरद पवार यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान शपथविधीपूर्वी चर्चा झाली होती, असा दावा करण्यात आला आहे.

पहाटेचा शपथविधी; आणखी एक मोठा ट्विस्ट, शरद पवार यांच्यानंतर नरेंद्र मोदींचंही नाव, कुणी केला बडा दावा?
Follow us on

दत्ता कनवटे, औरंगाबादः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सुप्रीम कोर्टात (Supreme court) एकिकडे घमासान सुरु आहे. तर राज्यात २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीवरूनही विविध दावे करणारे वक्तव्य समोर येत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी घेतलेल्या शपथेला शरद पवार यांची परवानगी होती. त्यांच्याच सांगण्यावरून हालचाली झाल्या, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांचे हे दावे विरोधी पक्षांकडून फेटाळण्यात येत आहेत. मात्र एका ज्येष्ठ नेत्याने यापेक्षाही मोठा दावा केला आहे. या शपथविधीत आतापर्यंत शरद पवार यांचं नाव चर्चेत होतं. आता तर शरद पवार यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान शपथविधीपूर्वी चर्चा झाली होती, असा दावा करण्यात आला आहे.

कुणी केला दावा?

शपथविधीच्या चर्चांमध्ये मोठा ट्विस्ट आणणारा दावा केलाय मनसे नेते प्रकाश महाजन यांनी. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवावा लागेल. पण यापूर्वी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तब्बल 45 मिनिटे चर्चा झाली होती. या चर्चेत काय घडलं होतं, नक्की कोणते मुद्दे होते, हे कळाल्यावर त्यातून काही गोष्टी समोर येऊ शकतील, असं वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केलंय.

पहाटेचा शपथविधी हे अजित पवार यांचं बंड होतं तर शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद, अर्थखातं दिलं. फक्त गृहखातं दिलं नाही.

शरद पवार माघारी का वळाले, असा प्रश्न आहे. राष्ट्रवादीतला एक गट यांनी शरद पवार यांना पटवून दिलंय, की पावसात भिजवून जे कमावलं, ते अशा शपथविधीवरून जाऊ शकतं. त्यांनीही विचार केला असेल.. एक डाग १९७८ चा आपण ४० वर्षापासून घेऊन वावरत आहोत. याचा विचार करून शरद पवार तीन दिवसात माघारी वळाले असावेत, असं वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केलंय.

‘फडणवीस यांच्या कारकीर्दीवरचा डाग’

पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीवरचा मोठा डाग आहे. तो त्यांना कधीही पुसता येणार नाही, अशी टीकाही प्रकाश महाजन यांनी केली आहे.

‘कोसळण्यासाठी पवार सरकार स्थापन करत नाहीत’

संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या दाव्याला रोखठोक उत्तर दिलंय. शरद पवार हे लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नेते आहेत. अशा प्रकारे कोसळण्यासाठी ते सरकार स्थापन करत नाहीत. त्यामुळे त्या शपथविधीला शरद पवार यांची संमती होती, हा दावा खोटा असल्याचं राऊत म्हणालेत. तसंच त्या दिवशी नेमकं काय झालं, हे रहस्य देवेंद्र फडणवीस कधीही बाहेर येऊ देणार नाहीत, असंही राऊत यांनी म्हटलंय.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही संजय राऊतांशी सहमत असल्याचं म्हटलंय. ते शरद पवार आहेत. त्यांना विचारून शपथविधी झाला असता तर सरकार पडलं नसतं. पवार यांना विचारून हे झालं नव्हतं, असं माझं पक्क मत असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणालेत.