‘ही’ एकच गोष्ट करणार अन् दाखवून देणार की आमचा निर्णय योग्यच!; अजित पवारांचं टीकाकारांना स्पष्ट उत्तर

| Updated on: Aug 28, 2023 | 11:26 AM

Ajit Pawar on Pimpri Chinchwad Problems : अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. त्याला अजितदादांनी उत्तर दिलं आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या समस्या सोडवण्यासाठी अजित पवारांनी सांगितली ट्रिक; म्हणाले...

ही एकच गोष्ट करणार अन् दाखवून देणार की आमचा निर्णय योग्यच!; अजित पवारांचं टीकाकारांना स्पष्ट उत्तर
Follow us on

पुणे | 28 ऑगस्ट 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच आहेत. पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. काही वेळा आधी अजित पवार यांच्या हस्ते 106 फुटी ध्वजाचा लोकार्पण झालं. यावेळी राष्ट्रवादीचे तटस्थ आमदार चेतन तुपे हेदेखील अजित पवार यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजपसोबत जाण्याचा आपला निर्णय योग्य होता हे लोकांना पटवून देऊ आणि टीका करणाऱ्यांना उत्तर देऊ, असं अजित पवार यावेळी म्हणाले. तसंच पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठीही उपाययाजना करणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

लोक आमच्यावर टीका टिपण्णी करत आहेत. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. मात्र कामातून आम्हाला दाखवून द्यायचं आहे की, आमचा निर्णय किती चांगला होता. येत्या काळात हे दाखवून देऊ, असं अजित पवार म्हणाले. उद्याचं भविष्य या तरुणांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांना चांगलं घडवण्याचं काम करूया. महापालिका निवडणुका लागल्या नाहीत. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे निवडणुका लागल्या नाहीत. एकनाथ शिंदे , फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मी कामाचा माणूस आहे. कामातून लोकांना उत्तर देणार आहे. सध्या वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. ती सोडवण्यासाठीही उपायोजना करणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले.

पुणे आणि पिंपरी आणि ग्रामीणच्या समस्या सोडवन्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार आहे. अधिकाऱ्यांना सध्या कुणाला विचारण्याची गरज नसणार आहे. कामं झाली पाहिजेत. अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक कुणी चुका केल्या तर त्यांना दुसरीकडे पाठवण्यात येईल. कुणाची गय केली जाणार नाही, असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.

झोपडपट्टी विरहित शहर करण्याचं काम आम्ही करत आहोत. पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे. राज्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काम करताना जातीयसलोखा ठेवण्याचं काम करतो आहोत. अल्पसंख्याक समाजाला असुरक्षित वाटणार नाही, याचीही काळजी घेतोय, असं अजित पवार म्हणाले.

परदेश दौऱ्यावरून परतातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या मुख्यलयाला भेट दिली. यावर अजित पवारांनी भाष्य केलं. पंतप्रधान मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञाचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी जय जवान, जय विज्ञान आणि जय अनुसंधानचा नारा दिला आहे, असं अजित पवार म्हणाले.