‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो’, उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Nov 29, 2020 | 2:41 PM

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्यानंतर अद्याप राज्य सरकारनं कुठलीही पाऊल उचललं नसल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला आहे. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, सर्वधर्मसमभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचं कामच आजपर्यंत झाल्याची टीकाही उदयनराजे यांनी केलीय.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो, उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
Follow us on

पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो,’ अशा शब्दात उदयनराजे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं. ‘देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या सरकारच्या काळात करुन दाखवलं होतं, पण आज त्यांना नावं ठेवली जातात. आज तुम्ही सत्तेत आहात तर करुन दाखवा,’ असं थेट आव्हानच उदयनराजे यांनी राज्य सरकारला दिलंय. (MP Udayanraje Bhosle criticize state government on Maratha reservation)

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्यानंतर अद्याप राज्य सरकारनं कुठलीही पाऊल उचललं नसल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला आहे. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, सर्वधर्मसमभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचं कामच आजपर्यंत झाल्याची टीकाही उदयनराजे यांनी केलीय.

आज मराठा म्हणून बोलत नाही- उदयनराजे

आपण मराठा समाजात जन्माला आलो असलो तरी आज मराठा म्हणून बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन, प्रत्येक समाजातील व्यक्तीला न्याय मिळायला हवा, या भूमिकेतून मुद्दे मांडत असल्याचं उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यातील सत्ताधाऱ्यांनीच मार्गी लावला पाहिजे, कारण त्यांनीच हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवल्याचा घणाघातही उदयनराजेंनी यावेळी केला.

राज्यात जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप करतानाच अन्य समाजाचे अधिकार, त्यांचं आरक्षण अबाधित ठेवा, पण मराठा समाजावर अन्याय का? असा प्रश्नही उदयनराजे यांनी विचारला आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेत जेवढे मराठा आणि अन्य समाजाचे खासदार-आमदार आहेत, त्या सर्वांची मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी असल्याचं आवाहनही उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं आहे.

‘मराठ्यांचे कैवारी ही उपमा तुम्हाला शोभते का?’

मराठ्यांचे कैवारी म्हणवणाऱ्यांना ही उपमा किती शोभा देते? असा सवालही उदयनराजे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही मराठा नेत्यांना विचारला आहे. यावेळी त्यांनी नाव घेणं मात्र टाळलं. पण त्यांचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर होता, अशी चर्चा आता सुरु आहे. दरम्यान, हा प्रश्न विचारताना आपल्या कुणीही शत्रू नाही. मग ते पवार साहेब असतील किंवा अन्य कुणी, असंही उदयनराजे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘किती दिवस मागायचं? आता हिसकवायचं!’

पत्रकार परिषदेसाठी खास बॅनर बनवण्यात आलं होतं. त्यावर ‘मराठा आरक्षण किती दिवस मागायचं? आता हिसकवायचं!’ असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उदयनराजे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं आज पहायला मिळालं.

संबंधित बातम्या:

मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही; उदयनराजेंचा सवाल

मराठा आरक्षणावर योग्यवेळी सपाटून बोलणार; उदयनराजेंचा सूचक इशारा

MP Udayanraje Bhosle criticize state government on Maratha reservation