Radhakrishna Vikhe Patil : लोकप्रतिनिधींचंही ऐकावं लागतं हे आता शिवसेना नेतृत्वाला कळलं असेलच; विखेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Radhakrishna Vikhe Patil : राज्याला सक्षम सरकार मिळालंय. राज्यात पूर सदृश्य परिस्थिती आहे. मात्र यंत्रणा सतर्क आहे. प्रशासन जागरूकतेने काम करतंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनावर नियंत्रण आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची प्रक्रिया होतच राहील.

Radhakrishna Vikhe Patil : लोकप्रतिनिधींचंही ऐकावं लागतं हे आता शिवसेना नेतृत्वाला कळलं असेलच; विखेंचा उद्धव ठाकरेंना टोला
राधाकृष्ण विखे पाटील
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 4:56 PM

शिर्डी : शिवसेनेने (shivsena) अखेर खासदारांच्या दबावाखाली येऊन भाजपच्या (bjp) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या या निर्णयाचं भाजपच्या काही नेत्यांनी स्वागत केलं आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने दिलेला पाठिंबा म्हणजे उशिराने सुचलेलं शहाणपण आहे. सर्व खासदार, लोकप्रतिनिधींचं ऐकावं लागतं, हे आता शिवसेनेच्या नेतृत्वाला कळाले असेल, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी लगावला आहे. विखे पाटील यांनी आज गुरूपोर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं साईबाबांचे दर्शन घेतलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला. महाराष्ट्राला लोकांचं सरकार मिळालं असून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मागील अडीच वर्षात राज्याची अधोगती झाली. महाविकास आघाडी सरकार म्हणजे विश्वासघाताने आलेलं सरकार होतं, अशी टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला नगण्य स्थान होतं. फक्त अर्थप्राप्तीसाठी काँग्रेसचे मंत्री महाविकास आघाडीमध्ये होते. काँग्रेसने आपला स्वाभिमान कधीच गहाण टाकलाय. काँग्रेसला राज्यात पूर्णपणे अनुल्लिखित करण्यात आल होतं, असा हल्लाबोल विखे पाटील यांनी काँग्रेसवर केला.

मुख्यमंत्र्यांना बळ दे

लोकांच्या आमच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील. कोविडचा संपूर्ण नायनाट व्हावा. राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी साईबाबांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शक्ती द्यावी. त्यांना आशीर्वाद द्यावा, अशी साई चरणी प्रार्थना केली, असं त्यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया होतच राहील

राज्याला सक्षम सरकार मिळालंय. राज्यात पूर सदृश्य परिस्थिती आहे. मात्र यंत्रणा सतर्क आहे. प्रशासन जागरूकतेने काम करतंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनावर नियंत्रण आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची प्रक्रिया होतच राहील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचं काम करू द्या, असंही ते म्हणाले.

पवारांनी आत्मचिंतन करावं

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शतप्रतिशत भाजप खासदार निवडून येतील. नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने लढवाव्या, अशी आमची इच्छा आहे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवारांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जनतेच्या भावनांचा विश्वासघात कुणी केला? याचं शरद पवारांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.