Raj Thackeray : तेच मैदान, बाळासाहेबांच्या सभेदरम्यानही झाली होती अजान… तेव्हा आणि आता नेमकं काय घडलं?

| Updated on: May 02, 2022 | 1:25 AM

2005 सालीही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत असाच प्रसंग घडला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या एका वाक्यानं औरंगाबाद महापालिकेत युतीची सत्ता आली होती, असं बोललं जातं

Raj Thackeray : तेच मैदान, बाळासाहेबांच्या सभेदरम्यानही झाली होती अजान... तेव्हा आणि आता नेमकं काय घडलं?
बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादेतील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जंगी सभा झाली. पोलिसांनी घालून दिलेल्या मर्यादेच्या कितीतरी अधिक पटीने लोक या मैदानावर जमले होते. राज ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात जातीवाद, शरद पवार (Sharad Pawar) आणि मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भाषण केलं. राज ठाकरे यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा जातीवादाचा गंभीर आरोप केला. तर मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन बोलत असतानाच अजान सुरु झाली. त्यावेळी राज ठाकरेंनी अधिक आक्रमक होत मशिदींवरील भोंगे (Loudspeaker on Mosque) हटवण्यावरुन सरकारला इशारा दिला. इतकंच नाही तर त्यांनी 4 तारखेपासून मशिदींवरील भोंग्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले. महत्वाची बाब म्हणजे 2005 सालीही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेतही असाच प्रसंग घडला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या एका वाक्यानं औरंगाबाद महापालिकेत युतीची सत्ता आली होती, असं सांगितलं जातं.

बाळासाहेबांचं एक वाक्य आणि महापालिकेत युतीची सत्ता!

2004 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आलं. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लागली. शिवसेना-भाजपच्या ताब्यात असलेली महापालिका खेचून आणण्यासाठी आघाडी सरकारने चांगलाच जोर लावला होता. तेव्हा 2005 साली याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. त्यांचं भाषण ऐन रंगात असतानाच अचानक अजान सुरु झाली. तेव्हा बाळासाहेब काही क्षण शांत झाले. सभेला उपस्थित कार्यकर्तेही शांत झाले. त्यानंतर एक हात कमरेवर ठेवून, दुसरा हाताचं बोट उंचावून बाळासाहेब ठाकरे गरजले… याचसाठी मी विचारतोय, तुम्हाला औरंगाबाद हवं की संभाजीनगर? बाळासाहेबांच्या या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या या एका वाक्यामुळे औरंगाबाद महापालिकेतील युतीची सत्ता टिकली असंही बोललं जातं.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंच्या सभेवेळीही अजान

तेच मैदान, तोच प्रसंग आणि बाळसाहेब ठाकरे यांचा पुतण्या राज ठाकरे. सभेच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास थोडक्यात मांडला. त्यानंतर ते जातीवादाच्या मुद्द्यावर आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांच्यामुळे राज्यातील राजकारणात जातीवादाचं विष पेरलं गेल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यानंतर राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. राज ठाकरे भोंग्यावरून आक्रमकपणे बोलत असतानाच अजान सुरू झाली. त्यामुळे राज ठाकरे थोडे थांबले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना अजान बंद करण्याची विनंती केली. आताच्या आता जाऊन तात्काळ अजान बंद करा. त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. त्यांना सरळ भाषेत कळत नसेल तर काय ते होऊन जाऊ द्या. महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे हे दाखवून देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

‘भोंगे उतरवा…पण आधी मशिदींवरचे मग मंदिरांवरचे’

सभेच्या वेळी बांग देत असतील तर त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. आताच्या जाऊन हे पहिल्यांदा बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊन जाऊ देत. तुम्ही अजिबात शांत बसता कामा नये. संभाजी नगर पोलिसांना हात जोडून विनंती करतो. परत सांगतोय. ऐकत नसतील तर महाराष्ट्रातील मनगटात काय ताकद आहे हे दाखवू. देशवासियांना विनंती आहे की, मागचा पुढचा विचार करू नका. भोंगे उतरलेच पाहिजे. सर्व धर्मीयांच्या स्थळांवरचे भोंगे उतरलेच पाहिजे. पण आधी मशिदीवरचे नंतर मंदिरावरचे. अभी नही तो कभी नही. हवं तर पोलिसांची परवानगी घ्या. त्यांना परवानगी द्यावीच लागते. परवानगी घेऊन जोरात हनुमान चालिसाचं पठण कराल. हा सामाजिकदृष्टया प्रलंबित प्रश्न मार्गी लावा. हातभार लावाल. ही विनंती करतो, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.