Raj Thackeray : ‘ही मनसेची सभा, काही गडबड कराल तर चौरंग करुन घरी पाठवीन’, राज ठाकरेंचा विरोधकांना इशारा

| Updated on: May 01, 2022 | 9:34 PM

काही टाळकी गडबड करायला आली असतील तर तिथल्या तिथे हाणा. ही मनसेची सभा आहे. इथे काही गडबड कराल तर चौरंग करुन घरी पाठवीन, अशा शब्दात राज यांनी गोंधळ घालणाऱ्यांना आणि एकप्रकारे सभा उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या संघटनांना थेट इशारा दिला.

Raj Thackeray : ही मनसेची सभा, काही गडबड कराल तर चौरंग करुन घरी पाठवीन, राज ठाकरेंचा विरोधकांना इशारा
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Image Credit source: TV9
Follow us on

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा पार पडली. औरंगाबाद पोलिसांनी 15 हजाराची मर्यादा घालून दिली असताना सभेला प्रत्यक्षात एक लाखापेक्षा अधिक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला कुणावरही टीका केली नाही. तर महाराष्ट्राचा इतिहास (History of Maharashtra) समजून घेण्याचं आवाहन लोकांना केलं. त्यावेळी त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतचा इतिहास थोडक्यात सांगितला. त्याचवेळी सभेत काही गडबड सुरु झाल्याचं राज ठाकरे यांच्या लक्षात आलं. त्यावेळी राज ठाकरे यांनी गोंधळ घालणाऱ्यांना थेट इशारा दिला. काही टाळकी गडबड करायला आली असतील तर तिथल्या तिथे हाणा. ही मनसेची (MNS) सभा आहे. इथे काही गडबड कराल तर चौरंग करुन घरी पाठवीन, अशा शब्दात राज यांनी गोंधळ घालणाऱ्यांना आणि एकप्रकारे सभा उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या संघटनांना थेट इशारा दिला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत केली. आज सर्वप्रथम मी सर्वांना महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. सभा होणार, नाही होणार. राज ठाकरेने सभा घ्यावी न घ्यावी, सभेला परवानगी मिळणार, नाही मिळणार… हे सगळं का केलं मला समजत नाही. मी महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात सभा घेतली असती तरी तुम्ही पाहिलीच असती नाही. मुंबईत गुढीपाडव्याला एक सभा घेतली. त्यानंतर त्या सभेनंतर अनेकजण बडबडायला लागले. मग त्यानंतर ठाण्यात उत्तरसभा घेतली. खरं तर दोनच सभा मी घेतल्या. पण या दोन सभांवर किती बोलत आहेत? ठाण्याची सभा झाली त्यावेळी दिलीप धोत्रेंनी मला फोन केला. दिलीप धोत्रेंनी सांगितलं संभाजीनगरला सभा घेऊया. संभाजी नगर हा तर महाराष्ट्राचा मध्य. मग मी त्याला सांगितलं. सभा घेऊ. पण तारीख सांगतो नंतर. हा विषय संभाजीनगर पुरता मर्यादित नाही. या पुढच्या सर्व सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार. विदर्भात, कोकणात, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. पण या सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही. कारण ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कोंबडं झाकायचं ठरवलं तरी सूर्य उगवतोच. आज या ऐतिहासिक संभाजीनगरमध्ये उरलीसुरली जी काही आहे ती संभाजीनगरमध्ये काढू. मला कल्पना आहे की महाराष्ट्रात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. संभाजीनगरमध्येही 10 दिवसानंतर पाणी येतं. सगळ्या अडचणी, सगळे प्रश्न प्रलंबित आहेत. मला याची पूर्ण कल्पना आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

‘अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य येतं ही महाराष्ट्रातील पहिली फेक न्यूज’

राज ठाकरे पुढे म्हणाले की, आज प्रमुख विषयांवर तुम्हाला बोलणार आहे. या संभाजीनगरचं मूळ नाव खडकी. आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच. एक आमचा देवगिरीचा किल्ला आणि त्यापूर्वी आमचं पैठण. मला असं वाटतं आजचा महाराष्ट्र दिन साजरा करताना महाराष्ट्र समजून घेणं गरजेचं आहे. जो जो समाज इतिहास विसरला त्याचा पायाखालचा भूगोल सटकला, जमीन सटकली. त्यामुळे आपण कोण हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्राचे, मराठी आहोत. या महाराष्ट्राने आजपर्यंत देशाला काय काय दिलं. मुळात हा देश एक भूमी होती. पण आमचे ज्ञानेश्वर गेल्यानंतर अल्लाऊद्दीन खिलजी इथे आला आणि आमच्या देवगिरीच्या किल्ल्यात शिरला. अल्लाउद्दीन खिलजीने एक लाख लोकं घेऊन येतो म्हणून सांगितलं. आमच्या किल्ल्यात फितूरी झाली. एक लाख लोकं नव्हती. हा इतिहास वाचतो तेव्हा कळतं. अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य येतं ही महाराष्ट्रातील पहिली फेक न्यूज. फेक न्यूज आपण सोशल मीडियावर येतात. महाराष्ट्रात अंधकार’.

हे सुद्धा वाचा

‘शिवाजी व्यक्ती नाही तो विचार आहे’

पुढचे चारशे वर्ष महाराष्ट्र खितपत होता. या महाराष्ट्रातील माता भगिनींवर अत्याचार होत होते. बलात्कार होत होते. मंदिरं पाडली जात होती. याच पैठणमध्ये आमच्या एकनाथ महाराजांनी आरोळी दिली दार उघड बये दार उघड. आता नाही पाहवत. आणि 1630 ला दार उघडलं. छत्रपतींचा जन्म झाला. स्वाभिमानाने कसं आणि काय जगायचं असतं हे आमच्या राजाने शिकवलं. महाराज गेले. इथे आमच्या नांदेडला राहणारे नरहर कुरुंदकर यांच्या पुस्तकात चांगलं वर्णन केलं आहे. शिवाजी महाराज म्हणजे कोण होते. आपण फक्त काय विचार करतो. अफजल खानाचा कोथळा काढला. शाहिस्तेखानाची बोटं छाटली. केवळ 50 वर्षाचं आयुष्य. एवढा मोठा राजा. बादशहा औरंगजेब. अग्र्याहून महाराष्ट्र निसटले म्हणून त्यांना मारायला सर्व सोडून आला. ज्याच्यासाठी तो माणूस राहिला नाही. त्याला शोधण्यासाठी औरंगजेब आला. 27 वर्ष तो इथे राहिला आणि इथे मेला. परत आग्र्याला गेला नाही. संभाजी राजे, ताराराणी साहेब, राजाराम महाराज, संताजी धनाजी लढले. 1707 मध्ये मेला तो. औरंगजेबाने जी पत्रं पाठवली त्यात तो कुणाचा उल्लेख करत नाही. तो फक्त महाराजाचं नाव घेतो. शिवाजी महाराज मला छळतो. ती प्रेरणा आहे. त्याला तो शिवाजी म्हणतो. तो वेडा नव्हता. त्याला कळलं होतं. शिवाजी व्यक्ती नाही तो विचार आहे. हा विचार भूमीत पसरला तर आपलं काही खरं नाही. तेच झालं, मराठी शाहीने मोगल साम्राज्य उद्धवस्त केलं’.

‘आमच्या अंगात शिवाजी आला पाहिजे, ही आमची मराठेशाही’

‘पाकिस्तानातील अटोक किल्ला तिथे भगवी पताका फडकली. हा मराठी शाहीचा इतिहास आपण विसरलो. आम्हाला काहीच माहीत नाही. आण्ही फक्त पुण्यतिथी आणि जयंती साजरी करतो महापुरुषांच्या. बाबासाहेब आंबेडकरांचं काय वाक्य आहे. ते म्हणाले, आमच्या लोकांच्या अंगात देवी आणि भुतं येतात. सर्व येतं. काय वाक्य आहे. अप्रतिम वाक्य आहे. बाबासाहेब म्हणतात ज्या दिवशी या लोकांच्या अंगात शिवाजी येईला तेव्हा अख्ख जग पदाक्रांत करू. आमच्या अंगात शिवाजी आला पाहिजे. ही आमची मराठेशाही. हा आमचा महाराष्ट्र’, असं राज ठाकरे म्हणाले.