Raj Thackeray : ‘रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत’, राज ठाकरेंच्या दाव्यावरुन वाद सुरु

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्या लोकमान्य टिळकांना आता तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय.

Raj Thackeray : रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत, राज ठाकरेंच्या दाव्यावरुन वाद सुरु
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Image Credit source: TV9
sagar joshi | Updated on: May 01, 2022 | 11:57 PM

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेतील सभेतून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी जातीपातीचं राजकारण केलं असा पुनरुच्चार राज यांनी केलाय. तसंच राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु झालं, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय. तसंच ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात पसरवली त्या बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या वृद्धापकाळात पवारसाहेबांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. तसंच रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्या लोकमान्य टिळकांना आता तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या दाव्यावरुन नवा वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.

‘वृद्धापकाळात पवारसाहेबांनी बाबासाहेब पुरंदरेंना त्रास दिला’

राज ठाकरे म्हणाले की, राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु झालं. जात प्रत्येकजण मानत होता. जात प्रत्येकाला प्रिय होती. पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरु झाला. माझा मराठा बांधव-भगिनी यांची माथी भडकवायची. मग कोणतरी जेम्स लेनसारखा माणूस उभा करायचा. मग त्याची काहीतरी पुस्तक लिहिलेलं त्याची काहीतरी गोष्टी काढायच्या. आणि ज्या माणसाने महाराष्ट्रात नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज देशात पोहोचवले, त्यांच्या वृद्धापकाळात पवारसाहेबांनी आपल्या बाबासाहेब पुरंदरेंना त्रास द्यायला सुरुवात केली. कशासाठी तर ते ब्राह्मण आहेत म्हणून. या राज ठाकरेच्या घरात आम्हाला कधी जातपात शिकवली नाही. आम्हाला जातपात माहिती नाही. आम्ही जातपात कधी बघत नाही आणि आम्हाला जातीपातीशी काही देणंघेणं नाही. मी जातो त्या वक्तीकडे बघून जातो, जातीकडे बघून जात नाही, पुस्तकं वाचून जात नाही.

लोकमान्य टिळकांना तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार का?

‘तुमच्या मतांच्या राजकारणासाठी हे सगळं ध्रुवीकरण करायचं. मग एवढचं आहे, तर मग रायगडावरची समाधी ही कुणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी कुणी बांधली ती आमच्या लोकमान्य टिकळांनी बांधली. लोकमान्य टिकळांना आता तुम्ही काय ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिकळांनी जे पहिलं वर्तमानपत्र काढलं त्याचं नाव काय, मराठा… हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत’, असा घणाघात राज ठाकरे यांनी केलाय.

पवारांना हिंदू या शब्दाचीच अॅलर्जी

पवारांना हिंदू या शब्दाचीच मुळात अॅलर्जी आहे. प्रत्येक वेळेला बोलताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आहेच. पण त्याआधी तो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांच्या तोंडी कधी शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. मी बोललो तेव्हापासून ते शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत. फोटोही लावत नाही. आता फोटो लावत नाही. मी जात मानत नाही. मी ब्राह्मणांची बाजू घेऊन बोलत नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पवारांवर हल्ला चढवला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us