Raj Thackeray : मशिदींवरील भोंग्याविरोधातील राज ठाकरेंचं आंदोलन यशस्वी झालं का? सर्वसामान्यांना काय वाटतं

| Updated on: May 04, 2022 | 11:04 PM

राज ठाकरे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत 90 ते 92 टक्के मशिदींवर पहाटे भोंगे वाजले नाहीत असा दावा करत आंदोलन यशस्वी झाल्याचं म्हटलंय. मात्र, सर्वासामान्यांना काय वाटतं? त्यांच्यामते राज ठाकरे यांचं आंदोलन यशस्वी झालं का? असा सवाल आम्ही युट्यूब पोलच्या माध्यमातून विचारला. त्यावर 1 लाखापेक्षा अधिक लोकांनी मत नोंदवलं आहे.

Raj Thackeray : मशिदींवरील भोंग्याविरोधातील राज ठाकरेंचं आंदोलन यशस्वी झालं का? सर्वसामान्यांना काय वाटतं
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलाय. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसोबत स्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. मागील आठवडाभर राज्यातील राजकारण या एकाच मुद्द्यावर पेटतं राहिलं. राज यांची आक्रमक भूमिका आणि मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता राज्य सरकारचीही सावध भूमिका पाहायला मिळाली.

मंगळवारी पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह 15 हजारापेक्षा अधिक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली. इतकंच नाही तर काही कार्यकर्त्यांना तडीपार करण्यात आलं, तर काहिंना ताब्यातही घेतलं. त्यामुळे राज ठाकरे यांचं आंदोलन यशस्वी होणार का? असाही एक प्रश्न विचारला जात होता. त्यावर आज राज ठाकरे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत 90 ते 92 टक्के मशिदींवर पहाटे भोंगे वाजले नाहीत असा दावा करत आंदोलन यशस्वी झाल्याचं म्हटलंय. मात्र, सर्वासामान्यांना काय वाटतं? त्यांच्यामते राज ठाकरे यांचं आंदोलन यशस्वी झालं का? असा सवाल आम्ही युट्यूब पोलच्या माध्यमातून विचारला. त्यावर 1 लाखापेक्षा अधिक लोकांनी मत नोंदवलं आहे.

64 टक्के लोक म्हणतात राज ठाकरेंचं आंदोलन यशस्वी

आम्ही युट्यूब पोलच्या माध्यमातून आम्ही राज ठाकरे यांचं आंदोलन यशस्वी झालं का? असा प्रश्न विचारला. ब्लॉग सुरु केल्यानंतर 7 तासांत 1 लाख 9 हजार 969 लोकांनी आपलं मत नोंदवलं. तर 64 टक्के लोकांना राज ठाकरे यांचं आंदोलन यशस्वी झाल्याचं म्हटलंय. 29 टक्के लोकांना राज ठाकरे यांचं आंदोलन यशस्वी झालं नाही असं वाटतं. तर 7 टक्के लोक सांगता येत नाही, असं म्हणत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांचं आंदोलन यशस्वी झालं असं बहुतांश लोकांना वाटत आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंच्या आंदोलनाबाबत टीव्ही 9 चा पोल

राज ठाकरे यांचा दावा काय?

राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेत आंदोलनाबाबत माहिती दिली. 90 टक्के मशिदींवर भोंगे वाजलेच नाहीत. त्यामुळे या मशिदींमधील मौलवींचे आभार मानतो, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच आजच्या अल्टिमेटमवर आपली भूमिका त्यांनी मांडली. विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले होते, की सर्व मशिदींना सूचना दिल्या आहेत. मग 135 मशिदींवर अजान झाली, त्यावर काय उत्तर आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी नांगरे पाटील यांना केला. ज्यांना हा विषय समजला, त्या सर्वांचे आभार. श्रेय घेण्याचा हा विषय नाही. मंदिरावरचे भोंगेही काढले गेले पाहिजेत. अजान लाउडस्पीकरवर झाली तर हनुमान चालिसाही चालणार, अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मांडली.