बाहेरचा की घरचा? कोथरुडची निवडणूक सर्वात सोपी : राज ठाकरे

| Updated on: Oct 18, 2019 | 9:42 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (18 ऑक्टोबर) पुण्यातील कोथरुड (Raj Thackeray in Kothrud Pune) येथे प्रचारसभा घेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर (Raj Thackeray on Chandrakant Patil) जोरदार टीकास्त्र सोडले.

बाहेरचा की घरचा? कोथरुडची निवडणूक सर्वात सोपी : राज ठाकरे
Follow us on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (18 ऑक्टोबर) पुण्यातील कोथरुड (Raj Thackeray in Kothrud Pune) येथे प्रचारसभा घेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर (Raj Thackeray on Chandrakant Patil) जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच कोथरुडची निवडणूक अगदी सोपी आहे. कोथरुडकरांना फक्त कोथरुडचा आमदार पाहिजे की बाहेरचा याचा निर्णय घ्यायचा आहे, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

राज ठाकरे म्हणाले, “चंद्रकांत पाटलांना ज्या कोल्हापुरात लहानाचे मोठे झाले, तेथून निवडणूक का लढवता आली नाही? तिकडे उभं राहायला भीती का वाटली? भाजपने चंद्रकांत पाटलांना येथून उभं करताना कोथरुडच्या नागरिकांना गृहीत धरलं. त्यांच्या डोक्यात सत्ता गेल्यानेच त्यांनी तुम्हाला असं गृहीत धरलं. कोथरुडची निवडणूक अगदी सोपी आहे. कोथरुडकरांना फक्त कोथरुडचा आमदार पाहिजे की बाहेरचा याचा निर्णय घ्यायचा आहे.”

कोथरुडची निवडणूक मत देणारा उमेदवार माझं काम करणार की नाही या एकमेव निकषावर व्हावी. कोथरुडमधील निवडणूक अगदी सोपी आहे. तुम्हाला कोथरुडचा प्रतिनिधी हवा की बाहेरचा हे ठरवायचं आहे, असं मत राज ठाकरेंनी नोंदवलं. चंद्रकांत पाटील निवडून आले, तर तुमची कामं करण्यासाठी उपलब्ध तरी होतील का? असाही सवाल राज ठाकरेंनी केला.

कोथरुडमध्ये मागील 15 वर्षात जी परिस्थिती नव्हती ती आज तयार झाल्याचं म्हणत आज येथे जातीपातीवरुन भेदभाव होत असल्याबद्दल राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, तो महाराष्ट्र आज जातीपातीत सडतो आहे. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचा आहे का? त्या राज्यांमध्ये जात विचारुन चहा द्यायचा की नाही हे ठरवलं जातं. आपल्याकडं राम गणेश गडकरींचा पुतळा पाडला गेला. पुतळा पाडणाऱ्यांना गडकरी कोण होते हे तरी माहिती होतं का? त्यांना राम गणेश गडकरी हे नितीन गडकरींचे नातेवाईक असतील, असंच वाटलं असेल. आपण महापुरुषांना आणि नेत्यांनाही जातीत विभागत आहोत.”

‘मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार’

राज ठाकरेंनी देशातील आर्थिक मंदीच्या स्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “देशाच्या परिस्थितीचा आपल्याला अंदाज नाही. माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी याबद्दल इशारा दिला आहे. आत्ता देशात आर्थिक मंदीची फक्त सुरुवात झाली आहे. पुढील काळात ही मंदी संपूर्ण देशाला व्यापून टाकणार आहे. यात मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार आहे, असंही सिंग यांनी सांगितलं.

‘मोदींमुळं देशात आर्थिक मंदी’

महाराष्ट्रातील उद्योग धंदे बंद होतील. सितारमन यांनी स्वतः महाराष्ट्रातील 5 लाख उद्योग बंद झाल्याचं सांगितलं आहे. ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांच्याच नोकऱ्या जाणार आहेत. नवीन नोकऱ्या येण्याचा प्रश्नच नाही. हे सर्व पंतप्रधान मोदी या एक माणसाच्या निर्णयामुळं झालं, असंही राज ठाकरेनी नमूद केलं.

राज ठाकरे म्हणाले, “माझं कुणाशीही वैयक्तिक वाद नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे हे झालं. मोदींनी नोटबंदी केली. त्यात अनेक लोकांचे जीव गेले. त्यांनी निर्णयानंतर 50 दिवसांचा वेळ मागितला. त्यानंतर आता अनेक दिवस झाले आहेत. पंजाब महाराष्ट्र बँकेत अनेकांचे पैसे अडकले. या बँकेतील अनेक खातेदारांचे जीव गेले. काहींनी आत्महत्या केली. ही आपल्या सभोवतालची परिस्थिती आहे. आपण यावर बोलण्याऐवजी दुसरंच काहीतरी बोलत आहोत. याची आपल्याला कुणीच जाणीव करुन देत नाही.”

‘प्रत्येक 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या’

अजूनपर्यंत तुम्हाला काही तोटा झाला नाही म्हणून आजच्या परिस्थितीचा विचारच करायचं नाही, असं नाही. मागील 5 वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या प्रमाणे प्रत्येक 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करत असल्याचं वास्तवही राज ठाकरेंनी मांडलं.

‘पुण्याच ट्रॅफिक प्रश्न मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याने’

पुण्याचे खासदार वाहतूकीत अडकले म्हणून त्यांनी बाणेरच्या रस्त्यावर पार्किंगला बंदी केली. मग आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकतो तेव्हा आम्ही काय करायचं? असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसेच पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याने तयार झाल्याचा आरोपही केला.

‘चुकलं तर प्रहार, चांगलं काम केलं तर कौतुक’

राज ठाकरे म्हणाले, “माझं कुणाशी वैयक्तिक वैर नाही. चुकलं तर प्रहार करणार, चांगलं काम केलं तर कौतुक करणार. मी कोता नाही. कलम 370 वर पहिला कौतुकाचा मेसेज मीच केला. मात्र, आज मोदी महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम 370 चा प्रचार करतात. मग महाराष्ट्राच्या मुद्द्यावर कधी बोलणार?” सरकारला जोपर्यंत प्रश्न विचारले जात नाही, तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. म्हणूनच मनसेला एक प्रबळ विरोधीपक्ष बनवण्यासाठी कोथरुडकरांसमोर आलो आहे, असंही त्यांनी नमूद केलं.