मुंबई : गुढीपाडव्याच्या शिवतीर्थावरील भाषणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुन्हा एकदा आपल्या भाषणाने महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) जोरदार हल्ला चढवला. ठाण्यातील उत्तरसभेत बोलताना राज यांनी गुढीपाडव्याच्या सभेतील भाषणावरुन विरोधकांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह अनेक नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. राज ठाकरे यांनी संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत वापरलेल्या शिवराळ भाषेवरून जोरदार हल्ला चढवला. लवंडे या शब्दाचा वापर करत त्यांनी राऊतांना लक्ष्य केलं.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात संजय राऊतांवर चांगलाच हल्ला चढवला. ‘नुसत्या फक्त प्रॉपर्टी अटॅच केल्या तर शिव्या द्यायला लागले पत्रकार परिषदेत. काय पण भाषा पत्रकार परिषदेतील…एक संपादक येतो काय म्हणतो तर *** ****… हे कुठचे आहेत तेच कळत नाही, हे शिवसेनेचे आहेत का राष्ट्रवादीचे आहेत. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी एक छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी… हे सगळे लवंडे. व वरती अनुस्वार आहे लक्षात ठेवा. पत्रावळी असते आणि द्रोण असतो. द्रोणात आमटी जिकडे पडेल तिकडे तो लवंडतो म्हणून हे लवंडे. इकडे पडली की शिवसेनेकडे लवंडे, तिकडे पडली की राष्ट्रवादीकडे लवंडे, हे असे लवंडे’, असं म्हणत राज यांनी राऊतांवर शेलक्या शब्दात निशाणा साधला.
इकडे महाराष्ट्रात कसं आहे एक एक जण पोहोचवला की पवारसाहेब मोदींची भेट घेतात पुढचा माणूस सांगायला. देशमुख गेले की परत एक भेट घेतली. अजितचं काय? मग रेड टाकल्या. रेड संपल्या की परत भेट घेतली. तो नवाब मलिक जरा फाजिलपणा जास्ती करतोय, जरा लक्ष द्या. मग नवाब मलिक… परवा दिवशी एक फोटो काढला सगळ्या राज्यसभेतील खासदारांचा, मग हळूच जाऊन परत आत भेटले. मग काय तरी संजय राऊत बद्दल बोलले. असं म्हणे… काय बोलले माहिती नाही. मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणावेळी म्हणालो होतो की, पवारसाहेब खूष झाले की भीती वाटायला लागते. आज पवारसाहेब संजय राऊतांवर खूष आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणारही नाही. यात अनेक काँग्रेसवाले गेलेले आहेत. उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते ते आज कळतंय.
इतर बातम्या :