Raju Shetti Upset | घरच्या कटारीचे घाव जिव्हारी, नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नकोच, राजू शेट्टी उद्विग्न

| Updated on: Jun 18, 2020 | 12:29 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव विधानपरिषदेसाठी निश्चित झाल्यावर पक्षातील काही नेते नाराज आहेत. (Raju Shetti Upset)

Raju Shetti Upset | घरच्या कटारीचे घाव जिव्हारी, नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नकोच, राजू शेट्टी उद्विग्न
Follow us on

मुंबई : राजू शेट्टी यांचे नाव विधानपरिषदेसाठी निश्चित झाल्यावर ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’तील काही नेते नाराज आहेत. “अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. घरच्या कटारीचे घाव जिव्हारी लागतात. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच” अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. (Raju Shetti Upset with Swabhimani Party Leaders Opposing Vidhan Parishad Candidature)

“अनेकांचे वार झेलले, पण इतका जखमी कधीच झालो नव्हतो. घरच्या कटारीचे घाव जिव्हारी लागतात. ‘स्वाभिमानी’ हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच.” असं राजू शेट्टी म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव विधानपरिषदेसाठी निश्चित झाल्यावर पक्षातील काही नेते नाराज आहेत. जालंदर पाटील आणि सावकार मदनाईक यांनी नाराजी व्यक्त केली.

राजू शेट्टी काय म्हणाले?

“राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी एका जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्वीकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. आम्ही विचार करुन कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. महावीर अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितले.” असे राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा : गोविंद बागेत ठरलं, राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर

“जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले. 12 जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकार मदनाईक, पक्षाचे अध्यक्ष जालंदर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एकमताने आघाडीचा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरले.” अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

“माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिकाऱ्यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणीवपूर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्या नावाबाबत एकमत केले व तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले. तो निरोप घेऊन मी 16 जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार साहेब यांना पक्षाचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांच्यासह भेटलो व होकार कळवला.” असे राजू शेट्टी यांनी सांगितले. (Raju Shetti Upset with Swabhimani Party Leaders Opposing Vidhan Parishad Candidature)

“आता काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषकारक आहे. गेल्या पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे. आजपर्यंत मी अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे घाव जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच…” असे राजू शेट्टी यांनी भावनाविवश होऊन सांगितले.

“शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं सभागृह हे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा विधानपरिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही. स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ उभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये. मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणीही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये.” अशी विनंती राजू शेट्टी यांनी केली.