Rajya Sabha Election : ‘आमच्यापर्यंत घोडाही आला नाही आणि बाजारही आलेला नाही’, शिवसेना आमदाराची प्रतिक्रिया, आता मुक्काम रिट्रिट!

| Updated on: Jun 06, 2022 | 9:57 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आपल्या सर्व आमदारांना आणि महाविकास आघाडीचे समर्थक असलेल्या अपक्ष आमदारांना वर्षा निवासस्थानी बोलावलं होतं. तिथे मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना उपयुक्त सूचना दिल्या आणि त्यानंतर बसमधून आमदारांची रवानगी हॉटेलवर करण्यात आली आहे.

Rajya Sabha Election : आमच्यापर्यंत घोडाही आला नाही आणि बाजारही आलेला नाही, शिवसेना आमदाराची प्रतिक्रिया, आता मुक्काम रिट्रिट!
शिवसेना आमदारांची बैठक
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा राजकीय धुरळा पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी एकूण सात उमेदवार उभे असल्यामुळे निवडणुकीत रंगत पाहायला मिळतेय. शिवसेनेचे (Shivsena) दोन, राष्ट्रवादीचा एक, काँग्रेसचा एक आणि भाजपचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अशावेळी घोडेबाजार टाळण्यासाठी आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं काम सर्वच राजकीय पक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी आपल्या सर्व आमदारांना आणि महाविकास आघाडीचे समर्थक असलेल्या अपक्ष आमदारांना वर्षा निवासस्थानी बोलावलं होतं. तिथे मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना उपयुक्त सूचना दिल्या आणि त्यानंतर बसमधून आमदारांची रवानगी हॉटेलवर करण्यात आली आहे. यावेळी माध्यमांनी विचारलं असता आमच्यापर्यंत घोडाही आला नाही आणि बाजारही आला नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया आमदार भारतशेठ गोगावले यांनी दिलीय.

‘घोडाही आला नाही आणि बाजारही आला नाही’

सर्वच अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. आज रिट्रिटला, उद्या ट्रायडंटला शिफ्ट केलं जाणार आहे, असं आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितलं. तर आमदार भारतशेठ गोगावले म्हणाले की, पक्षानं व्हिप दिला आहे. त्याप्रमाणे आम्ही चाललो आहोत. आता आम्हाला बसमधून फिरायला घेऊन जात आहेत. चार दिवसांची आमची ट्रिप आहे. चार दिवसात आम्ही फिरुन येऊन दोन्ही उमेदवार आम्हाला निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी आम्हाला घेऊन जात आहेत. घोडेबाजाराच्या चर्चेबाबत विचारलं असता, आमच्यापर्यंत घोडाही आला नाही आणि बाजारही आला नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिलीय.

हे सुद्धा वाचा

‘कोणताही घोडा विक्रीला नाही त्यामुळे बाजाराचा प्रश्नच नाही’

पक्षाचे आमदार, अपक्ष आमदार आणि मदत करणारे आमदार सर्व सोबत होते. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो आदेश दिला आहे त्याचं 100 टक्के पालन होईल. वरीष्ठ नेते आता जी रणनिती ठरवतील त्यानुसार सगळं घडेल, असं आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. सत्तार यांनाही घोडेबाजाराच्या चर्चेबाबत विचारलं असता कोणताही घोडा विक्रीलाच नाही तर बाजाराचा प्रश्नच नाही, असं ते म्हणाले.

‘साहेबांचा आमच्यावर, आमचा साहेबांवर विश्वास’

वर्षा निवासस्थानावरील बैठकीला शिवसेनेचे सर्व आमदार होते, अपक्षही होते. 10 तारखेला मतदान करायचं आहे आणि त्यासाठी रणनिती ठरली आहे. आम्ही रिट्रिट हॉटेल पवईला जात आहोत. साहेबांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आमचा साहेबांवर विश्वास आहे. पण आम्हा सर्वांना एकत्र राहून, टीम वर्कने ही लढाई जिंकायची आहे आणि त्यासाठी आम्ही जात आहोत, असं आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितलं.