जुनी नावे बदलू नयेत, औरंगाबादच्या नामांतराला विरोध : रामदास आठवले

| Updated on: Mar 02, 2020 | 8:47 AM

कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असे पक्षाला वाटते. मात्र राज्य शासनाने जर ठरवले, तर नावात बदल केला जाऊ शकतो, असं रामदास आठवले म्हणाले

जुनी नावे बदलू नयेत, औरंगाबादच्या नामांतराला विरोध : रामदास आठवले
Follow us on

ठाणे : शिवसेनेपाठोपाठ मनसे आणि भाजपनेही ‘औरंगाबाद’ शहराचे ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्याचा आग्रह धरला असतानाच भाजपच्या मित्रपक्षाचा मात्र विरोधाचा सूर आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्यास रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे. (Ramdas Athawale on Aurangabad)

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपाइंचा विरोध आहे. कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असे पक्षाला वाटते. मात्र राज्य शासनाने जर ठरवले, तर नावात बदल केला जाऊ शकतो, असं रामदास आठवले म्हणाले. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नामांतराचा मुद्दा गाजत आहे. भाजप आणि रिपाइं निवडणुकांना एकत्र सामोरे जात असतानाच मित्रपक्षांमध्ये मतांतरं दिसत आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपाइंला 5-6 जागा हव्या आहेत. इथेही महायुतीचाच महापौर असेल. औरंगाबाद महापालिकेची निवडणूकही आम्ही सन्मानाने लढणार असून इथेही महायुतीची सत्ता असेल असं आठवले म्हणाले.

‘रिपाइं’चा मेळावा लवकरच होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आमचा पक्ष पूर्ण ताकदीने भाजपसोबत राहून शिवसेनेला पराभूत करणार आहे. 2022 मध्ये मुंबईचा महापौर भाजपचाच असेल, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला.

ज्या संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांच्यावरच शिवसेनेने अन्याय केला. किमान त्यांना ‘सामना’चं संपादकपद तरी द्यायला हवं होतं, असा टोमणाही रामदास आठवले यांनी लगावला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर प्रांतवादाची भूमिका सोडली, तर त्यांचं महायुतीत स्वागत आहे. परंतु त्यांच्या येण्यामुळे, किंवा न येण्यामुळे महायुतीला काहीही फरक पडणार नाही, असं सांगायलाही रामदास आठवले विसरले नाहीत.

दिल्लीमधील दंगलीला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहेत. त्यांनी ठरवले असते तर  ही दंगल थांबू शकली असती. परंतु ‘आप’च्या नगरसेवकाने ही दंगल भडकवली. काँग्रेसने ती आणखी भडकवली, असा आरोपही आठवले यांनी केला. केंद्रात आमचे सरकार असल्याने दंगलीसाठी आम्ही कसे जबाबदार? असा प्रतिप्रश्न त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना त्यांनी विचारला.

ठाण्यातील मो. ह. विद्यालयात शांताबाई कृष्णा कांबळे यांच्या 97 व्या वाढदिवसानिमित्त केंदीय मंत्री आठवले उपस्थित राहिले होते. (Ramdas Athawale on Aurangabad)