प्रकाश आंबेडकर बोलले ते बरोबरच!, उद्धव ठाकरेंनी मविआपासून दूरच राहावं; ‘या’ मंत्र्यांचा सल्ला

| Updated on: May 25, 2023 | 10:55 AM

Uday Samant on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या मंत्र्याचा सल्ला; म्हणाले...

प्रकाश आंबेडकर बोलले ते बरोबरच!, उद्धव ठाकरेंनी मविआपासून दूरच राहावं; या मंत्र्यांचा सल्ला
Follow us on

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे रत्नागिरीत येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मंत्री उदय सामंत रत्नागिरीत उपस्थित आहेत. यावेळी बोलताना उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीवरही त्यांनी टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, महाविकास आघाडीच्या नादी लागू नये. त्यावर बोलताना सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर तळागाळात काम करणारे नेते आहेत. ते जर बोलत असतील तर त्यावर उद्धव ठाकरेंनी विचार करणं गरजेचं आहे. ठाकरे गट आणि वंचित यांनाच एकत्र यावं लागेल. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर किती कंफर्टेबल असतील मला माहिती नाही, असं उदय सामंत म्हणालेत.

काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकलं आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेलं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी ही काही वर्षांपुर्वी राष्ट्रवादीत होतो, पण 2014 ला मी राष्ट्रवादी सोडली. आता मी शिवसेनेत आहे. पण एवढं निश्चितपणे सांगतो की, महाविकास आघाडी पुढे सत्तेत येणार नाही, असं सामंत म्हणालेत.

कितीही नागनाथ-सापनाथ एकत्र आले तरी सरकार आमचंच येणार. त्यांच्याकडे नागनाथ-सापनाथ आहेत. पण आमच्याकडे एकनाथ आहेत, त्यामुळे आमचंच सरकार येणार आहे, असंही उदय सामंत म्हणालेत.

मुख्यमंत्री शिंदे हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. खारघरसारखी दुर्घटना घडू नये, म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात विशेष काळजी घेण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी मंडपात प्रत्येक खुर्चीवर पाण्याची बाटली आणि इलेक्ट्रॉल पावडरची पाकिटं ठेवण्यात आली आहेत.

कोकणामध्ये पहिल्यांदाच जर्मन हँगर्स पद्धतीचा मंडप उभा करण्यात आलाय. 36 फूट उंच, 335 फूट लांब आणि 135 फूट रुंद असा हा हवेशीर मंडप असणार आहे. सिलिंग फॅन आणि कुलरची व्यवस्था या मंडपात करण्यात आली आहे. तर शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी बॅनर्स झळकलेले पाहायला मिळत आहेत.