भाजपची ताकद वाढली, कोकणात रविंद्र चव्हाणांनी मोठा डाव टाकला, काय आहे नवीन समीकरण?
भाजपने कोकणात पुन्हा लक्ष केंदीत केलं आहे. कोकणात आणखी ताकद वाढावी, यासाठी रविंद्र चव्हाणांनी मोठा डाव टाकलाय.

भाजपकडून राज्यभरात विविध भागात जोरदार कामाला सुरुवात केल्याचे दिसत आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक झाली. त्यानंतर आता भाजपकडून जिल्हा पातळीवर कार्यकारिणी बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे एकदिवसीय रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान इतर पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपच्या ठरावानुसार, सावंतवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. तर रत्नागिरीसाठी दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी भागात जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत रविंद्र चव्हाण यांनी संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने मैदानात उतरून गावागावात देशभक्त कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचं आवाहन चव्हाण यांनी केलं. तसेच बूथ पातळीवर सघंटनेची मजबूत बांधणी करण्याचाही संदेश दिला. विकासकामे आणि विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचाही संदेश चव्हाणांनी दिला. तसेच त्यांनी सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचण्याचे निर्देशही दिले.
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हा कार्यकारिणी बैठकीदरम्यान प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपा परिवारात प्रवेश
📌 पक्ष प्रवेश करणारे मान्यवर –
मंडणगड नगरपंचायतीमधील पाणीपुरवठा समितीचे सभापती सुभाष सापटे, नगरसेवक शैलेश शिवगण, नगरसेविका समृद्धीताई शिगवण,… pic.twitter.com/nZcgcuDOdv— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) September 9, 2026
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार आहे. त्याचबरोबर विविध नगरपरिषदांमध्ये मोठ्या संख्येने भाजपचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक कार्यरत आहेत. त्यामुळे विकासकामांना संघटनात्मक संपर्काची जोड देत पक्षाचा जनाधार आणखी विस्तारण्याचे उद्दिष्ट या बैठकांमध्ये अधोरेखित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर एसआयआर, सेवा संकल्प अभियान, पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्ग यांसह विविध संघटनात्मक विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. रविंद्र चव्हाण यांनी कणकवली, रत्नागिरीत भाजप भवन जिल्हा कार्यालयाच्या उभारणी कामाची पाहणी केली.
केंद्रीय गृहमंत्र्याच्या आवाहनानुसार कार्यालये केवळ पक्षाचे प्रशासकीय केंद्र न राहता राष्ट्रसेवेची कार्यशाळा, कार्यकर्त्यांचे उर्जाकेंद्र म्हणून विकसित व्हावी, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. रत्नागिरीत सतीशराव मोरे आणि प्रशांत यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयांना चव्हाणांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उत्तर रत्नागिरीमध्ये विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशातून उत्तर रत्नागिरी परिसरात ताकद वाढणार असल्याचा दावा भाजप नेत्याकडून केली जात आहे.