स्थानिकांना डावलल्याने ठाणेकरांमध्ये नाराजी, पालकमंत्री पदावरुन आता राजकारण..!

ठाण्याचे पालकमंत्री पद हे स्थानिकाला मिळाले असते तर विकास कामे झपाट्याने झाली असती. पण सातारा जिल्ह्यातील शंभूराजे यांना हे पद देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपामध्ये देखील नाराजी झाल्याचे पाहवयास मिळाले होते.

स्थानिकांना डावलल्याने ठाणेकरांमध्ये नाराजी, पालकमंत्री पदावरुन आता राजकारण..!
महेश तपासे, राष्ट्रवादी प्रवक्ते
| Updated on: Oct 02, 2022 | 5:47 PM

 सुनील जाधव Tv9 मराठी प्रतिनिधी, ठाणे : पालकमंत्र्यांच्या निवडी होऊन आता 15 दिवस उलटले आहेत. मात्र, त्यानंतरही या निवडीमागे काय राजकारण (Politics) आहे त्याचा तर्क आता विरोधक आणि स्थानिकांकडून सुरु झाला आहे. ठाणे (Thane) हा मुख्यमंत्र्यांचाच जिल्हा आहे. असे असतानाही या जिल्ह्याचे पालकत्व हे स्थानिक आमदाराला मिळाले नाहीतर या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे शंभूराजे देसाई यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, आपल्या गावचा सहकारी म्हणूनच (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनी त्यांना संधी दिल्याचा आरोप आता राष्ट्रवादीकडून केला जात आहे. तर ठाणे जिल्ह्यातील तीन मतदार संघावर भाजपाचा डोळा असल्याचा आरोपही राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

ठाण्याचे पालकमंत्री पद हे स्थानिकाला मिळाले असते तर विकास कामे झपाट्याने झाली असती. पण सातारा जिल्ह्यातील शंभूराजे यांना हे पद देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपामध्ये देखील नाराजी झाल्याचे पाहवयास मिळाले होते. स्थानिकांना येथील प्रश्नांची जाण असते पण मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे असले तरी त्यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातले आहे. त्यामुळेच शंभूराजेंची वर्णी लागल्याचे तपासे म्हणाले आहेत.

बंडामध्ये ठाणे जिल्ह्यातील तीन आमदार होते. यामध्ये प्रताप सरनाईक आहेत ,विश्वनाथ भोईर, बालाजी किनीकर यांचा समावेश आहे. यांच्यापैकी एकाला कोणाला मंत्री म्हणून जबाबदारी दिली असती तर कल्याण डोंबिवलीच्या पंचक्रोशीचा देखील चांगला विकास झाला असता असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला .

सरनाईक यांचा मतदार संघ भाजपाला सोडवा यावरुन मुख्यमंत्री आणि प्रताप सरनाईक यांच्यात मतभेद झाले असल्याची चर्चा आहे. भाजपा हा शिंदे गटाचा राजकीय उपयोग करुन घेत आहे. ही बाब आता लक्षात येऊनही काही उपयोग होणार नसल्याचे तपासे यांनी सांगितले आहे. बंडखोरी करुनही आपला मतदार संघ ताब्यात राहतो की नाही अशी अवस्था आमदार विश्वनाथ भोईर यांची झाली आहे.

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. शिवाय मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे म्हणल्यावर सर्वकाही ठाण्याला मिळेल अशी आशा होती. पण याच जिल्ह्यातील प्रमुख मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्वाचे आहे.

Follow Us