Sanjay Pawar : …तर राजीनामे द्या आणि पुन्हा निवडून येवून दाखवा, संजय पवारांचं बंडखोर खासदारांना आव्हान

कोल्हापुरात निवडून येणे न येणे हा कोल्हापूरकरांचा करिश्मा आहे. मोदींच्या करिश्म्याचा फायदा आपल्याला होईल, असा विचार करणाऱ्या बंडखोरांना यावेळी पवार यांनी सुनावले.

Sanjay Pawar : ...तर राजीनामे द्या आणि पुन्हा निवडून येवून दाखवा, संजय पवारांचं बंडखोर खासदारांना आव्हान
बंडखोर नेत्यांवर बोलताना शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार
Image Credit source: tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jul 20, 2022 | 6:08 PM

कोल्हापूर : दोन्ही खासदारांनी (Shivsena’s MPs) घेतलेल्या निर्णयासंबंधीची चर्चा ऐकून धक्का बसला. शिवसेनाप्रमुखांनी टाकलेला विश्वास, मतदारांनी केलेले मतदान एका क्षणात कसे विसरले, असा सवाल शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) वाटेवर आहेत. त्यांनी अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही, मात्र त्यांच्या हालचालींवरून चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक मन म्हणत आहे, की हे दोघेही असे काही करणार नाही. अनेकांच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. त्यामुळे ते असे काही करणार नाहीत. केवळ चर्चा सुरू आहेत, म्हणजे ते गेले असे मानणारा मी नाही, असे संजय पवार (Sanjay Pawar) म्हणाले.

‘हाडाची काडे करून निवडून आणले’

ते म्हणाले, की शिवसैनिकांचे स्वप्न होते शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्याचे. मागील दोन-अडीच वर्षात कोणालाही निधी मिळालेला नाही, हे काही कारण होऊ शकत नाही बाहेर पडण्याचे. कोरोनाच्या काळात बराचसा निधी कोरोनासाठी खर्च झाला. त्यामुळे निधीसाठी कुणी असे काही करू नये. शिवसैनिक म्हणून माझ्या भावना वेगळ्या आहेत. शिवसेनाप्रमुख कायम कोल्हापुरात आल्यानंतर खंत व्यक्त करायचे, की अंबाबाईच्या दर्शनाने राजकीय कामांची सुरुवात करतो. इथे आमदार आहे मात्र आपला खासदार नाही. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी हाडाची काडे करून सकाळी साडे पाचला उठून, जोमाने काम करून खासदार निवडून आणला. त्यामुळे या सगळ्यांच्या भावना ऐका, गद्दारांच्या भावना ऐकू नका, असे आवाहन त्यांनी केले.

काय म्हणाले संजय पवार?

‘इथे फक्त कोल्हापूरकरांचा करिश्मा’

कोल्हापुरात निवडून येणे न येणे हा कोल्हापूरकरांचा करिश्मा आहे. मोदींच्या करिश्म्याचा फायदा आपल्याला होईल, असा विचार करणाऱ्या बंडखोरांना यावेळी पवार यांनी सुनावले. कोल्हापुरात ते हारले होते. त्यामुळे इथे केवळ कोल्हापूरकर, शिवसेनाप्रमुखांचा करिश्मा असेल, असे ते म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीत या सर्वांचा परिणाम दिसेल. या सर्वामागे भारतीय जनता पार्टीचे षडयंत्र आहे. शिवसेनेत फूट पाडण्याचे काम भाजपाने केले. आज पहिल्या बेंचवर असणारे हे खासदार उद्या शेवटच्या बेंचवर दिसतील, असेही ते म्हणाले. तुमच्या गटामुळे निवडून येत असाल तर राजीनामे द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा, असे आव्हानही त्यांनी यावेळी बंडखोरांना दिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us