BREAKING | कोर्लई गावच्या माजी सरपंचांना अटक, रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढणार?

रेवदंडा पोलिसांनी आज कोर्लेई गावातील 19 बंगले घोटाळा आरोपांच्या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कोर्लई गावच्या माजी सरपंचांना अटक केली आहे. त्यामुळे आता रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

BREAKING | कोर्लई गावच्या माजी सरपंचांना अटक, रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढणार?
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 10, 2023 | 10:47 PM

रायगड : रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या नावाने 19 बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण नंतर आरोप करण्यात आल्यानंतर संबंधित बंगले जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेला. याच आरोपांप्रकरणी चौकशी सुरु असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली आहे. 19 बंगल्याच्या फसवणुकी प्रकरणात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

रेवदंडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक आणि बनावट दस्तावेज बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज पोलिसांनी मोठी कारवाई करत थेट माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली आहे.

उद्धव ठाकरे परिवाराच्या 19 बंगले घोटाळ्याप्रकरणी आज पोलिसांनी कोर्लईच्या प्रशांत मिसाळ या माजी सरपंचाची अटक केली आहे. 19 बंगल्यांचा हिशोब उद्धव ठाकरेंना द्यावाच लागणार, असा दावा किरीट सोमय्यांनी केला.

किरीट सोमय्या यांचे नेमके आरोप काय?

“रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

“रश्मी ठाकरे यांच्या जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराचे कागदपत्रे गहाळ करायला लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.

रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढणार?

किरीट सोमय्या यांनी याप्रकरणात थेट रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. ते 19 बंगले रश्मी ठाकरे यांच्या नावावर होते, असा आरोप सोमय्या यांनी केलाय. सोमय्या यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यापैकी अनेकांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या ससेमिऱ्याला सामोरं जावं लागलं आहे. अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता सोमय्यांनी कोर्लई येथील 19 बंगल्यांंच्या आरोपाप्रकरणी माजी सरपंचाला अटक केल्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांचा तपास रश्मी ठाकरे यांच्या नावापर्यंत येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.