राहुल गांधींचं ‘ते’ वक्तव्य ‘बकवास’ वाटत असेल तर मोदींची आधीची विधानं तपासा, शिवसेनेचा टोला

| Updated on: Oct 08, 2020 | 8:40 AM

पंतप्रधान मोदींची अशा प्रकारची वक्तव्ये तपासून घ्यायला हवीत, असा टोला शिवसेनेनं मोदींना लगावला आहे. (Saamana Editorial on India-China Border Issue)

राहुल गांधींचं ते वक्तव्य बकवास वाटत असेल तर मोदींची आधीची विधानं तपासा, शिवसेनेचा टोला
Follow us on

मुंबई : ‘लडाखमध्ये घुसलेले चिनी सैन्य बाहेर कधी काढणार? आमचे सरकार असते तर चिन्यांना पंधरा मिनिटांत उचलून बाहेर फेकले असते,’’ असा हल्ला राहुल गांधी यांनी केला. त्यावर अद्याप भाजपकडून प्रत्युत्तर आलेले दिसत नाही. चिन्यांना पंधरा मिनिटांत बाहेर काढू, असे राहुल गांधींचे म्हणणे कुणाला ‘बकवास’ वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान मोदींची अशा प्रकारची वक्तव्ये तपासून घ्यायला हवीत, असा टोला शिवसेनेनं मोदींना लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून याबाबतची टीका करण्यात आली आहे. (Saamana Editorial on India-China Border Issue)

“जे सरकार देशांतर्गत राजकीय विरोधकांवर सायबर हल्ले करु शकते, त्यांना चीनशी लढणे कठीण नाही. 80 हजार फेक अकाऊंटस्च्या माध्यमातून लढलेल्या सायबर युद्धात शेवटी पराभवच पत्करावा लागला, पण लडाखच्या सीमेवर आणि कश्मीर खोऱ्यात आपल्याला जिंकावेच लागेल. चीनबरोबर युद्धास तयार असल्याची गर्जना हवाई दलप्रमुखांनी केलीच आहे. देश त्यांच्या सदैव पाठीशी आहे! राहुल गांधींनी पंधरा मिनिटांत चिन्यांना मागे हटवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. त्यांच्याकडे त्याबाबत कोणती योजना आहे? त्यावरही पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींशी बोलायला हवे. शेवटी राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहेच!,” असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.

“राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘‘लडाखमध्ये घुसलेले चिनी सैन्य बाहेर कधी काढणार? आमचे सरकार असते तर चिन्यांना पंधरा मिनिटांत उचलून बाहेर फेकले असते,’’ असा हल्ला राहुल गांधी यांनी केला. त्यावर अद्याप भाजपकडून प्रत्युत्तर आलेले दिसत नाही. राहुल गांधी हे आधी हाथरसमध्ये गेले, नंतर पंजाबात व आता हरयाणात त्यांनी शेतकऱ्यांच्या मोर्चाचे नेतृत्व केले. पोलिसांच्या विरोधाची पर्वा त्यांनी केली नाही. राहुल गांधी यांचे प्रतिमाभंजन करूनही हा गडी थांबायला तयार नाही, हे महत्त्वाचे. चीनप्रकरणी राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले व त्यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसूनही पंतप्रधान इतके थंड कसे? हा त्यांचा सवाल आहे. चिन्यांना पंधरा मिनिटांत बाहेर काढू, असे राहुल गांधींचे म्हणणे कुणाला ‘बकवास’ वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान मोदींची अशा प्रकारची वक्तव्ये तपासून घ्यायला हवीत,” अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

“पाकिस्तानच्या ताब्यातील कश्मीर खेचून आणण्याची भाषा कोणी केली होती, प्रत्येक कश्मिरी पंडिताची ‘घर वापसी’ करण्याचे वचन कोणी दिले होते व आता त्या वचनांची काय स्थिती आहे, ते स्पष्ट व्हायला हवे.”

वर्षभरात कश्मीर खोऱ्यात किती जवानांचे बळी गेले, त्याचा आकडा समोर आला पाहिजे 

“सर्जिकल स्ट्राइक वगैरे करुन निवडणुका जिंकता आल्या, पण पाकिस्तानचे संपूर्ण कंबरडे मोडता आलेले नाही, हे सत्य जितक्या लवकर स्वीकारले जाईल तितके देशाच्या सुरक्षेसाठी ते बरे राहील. गेल्या वर्षभरात कश्मीर खोऱ्यात किती जवानांचे बळी गेले, याबाबत खरा आकडा समोर आला पाहिजे. महाराष्ट्रातच आठवड्यातून एक-दोन जवानांचे तिरंग्यात लपेटलेले देह येत आहेत. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे,” असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.

“गलवानच्या चिनी घुसखोरीनंतर दोन देशांत चर्चेच्या सात फेऱ्या झाल्या. चीनसोबतच्या सीमावादावर चर्चेने तोडगा निघू शकतो असा हवाई दलप्रमुख भरवसा देत आहेत. मग चिन्यांनी गलवान खोऱ्यात आमचे 20 जवानांचे बळी का घेतले? आमचे जवान सर्व प्रकारच्या आव्हानांशी सामना करण्यास समर्थ आहेतच, ते देशांच्या सीमा रक्षणासाठी सदैव सज्ज आहेत. जवानांचे शौर्य आणि त्यागच देशाला सदैव सुरक्षित ठेवत आहे, पण म्हणून त्यांना नाहक बळी जाऊ द्यायचे काय?” असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे,

“सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारवर सायबर हल्ले करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंटस् सोशल मीडियावर उघडण्यात आले. त्यातील बहुसंख्य अकाऊंटस् नेपाळ, टर्की, सिंगापूर, जपान, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका, अमेरिकेतून चालविण्यात आली. जे सरकार देशांतर्गत राजकीय विरोधकांवर सायबर हल्ले करू शकते, त्यांना चीनशी लढणे कठीण नाही,” असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे. (Saamana Editorial on India-China Border Issue)

संबंधित बातम्या : 

मोदींची सत्तेतील 19 वर्ष पूर्ण, नेहरूंपासून क्लिंटनपर्यंत तुलना, शुभेच्छांचा वर्षाव

‘या’ सरकारचं नेमकं चाललंय काय?, शिवसेनेचा केंद्राला सवाल