मुख्यमंत्र्यांना फक्त 40 आमदारांच्या खोक्यांची काळजी; सामनातून योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य अन् शिंदेंवर निशाणा

| Updated on: Jan 07, 2023 | 7:55 AM

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य करण्यात आलंय. वाचा...

मुख्यमंत्र्यांना फक्त 40 आमदारांच्या खोक्यांची काळजी; सामनातून योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य अन् शिंदेंवर निशाणा
Follow us on

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य करण्यात आलं आहे. या दौऱ्यावर भाष्य करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधण्यात आला आहे. “योगी गुंतवणूकदारांना लखनौला येण्यासाठी निमंत्रित करीत होते, तेव्हा आपले मुख्यमंत्री नाशकातील पालापाचोळा-कचरा गोळा करून ठाकऱ्यांची शिवसेना फोडण्याचा आव आणीत होते व त्या पालापाचोळय़ासमोर दंड ठोकून भाषण करीत होते. उत्तर प्रदेश-बिहारचे राज्यकर्ते मुंबईत येऊन येथील गुंतवणुकीची लूट करीत आहेत व मुख्यमंत्री शिवसेना पह्डण्याच्या कामात रमले आहेत. माणसाला त्याच्या लायकीपेक्षा वरचे पद मिळाले की हे असे घडायचेच”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

अयोध्येत महाराष्ट्र भवनाची जागा देण्याचे मान्य करून योगी महाराजांनी मुंबईतून 5 लाख कोटी नेले. म्हणजे महाराष्ट्राच्या हाती आवळा देऊन कोहळा काढण्याचाच हा प्रकार.पण सत्तेवर दुर्बळ, लाचार, बधिर सरकार असल्यावर दुसरे काय व्हायचे? मुख्यमंत्र्यांना फक्त चाळीस आमदारांच्या खोक्यांची काळजी. पुन्हा जमले तर शिवसेनेच्या महावृक्षाखालचा पाचोळाही गोळा करायचा आहे. तीन महिन्यांपूर्वी केलेल्या ‘क्रांती’वर थुकरट भाषणे करायची आहेत. महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यायला वेळ आहेच कुठे?, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्यांचे व्यावसायिक परममित्र अजय आशर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी ‘मैत्री’ नामक संस्था उभी केली. त्या ‘मैत्री’ने ही गुंतवणूक बाहेर कशी जाऊ दिली? की या पाच लाख कोटींमागे टक्केवारीचे ‘समृद्धी’ हिशेब झाले. सरकारचे जे बिऱहाड दावोसला बर्फ उडवायला निघाले आहे त्या बिऱहाडात या अजय आशरचाही समावेश आहे हे विशेष.

मुंबईतील गुंतवणूक दुसरेच लोक पळवत आहेत व आपले सरकार परदेशी गुंतवणुकीसाठी दावोसला निघाले म्हणजे-‘मधु मागशी माझ्या सख्या परी मधु घट हे रिकामे पडती घरी… याच काव्यपंक्तीप्रमाणे चालले आहे’, असं म्हणत सामनातून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करण्यात आली आहे.