Uddhav Thackeray: “फडणवीसजी, तुम्ही सत्तेत आहात आता कुणाचा राजीनामा मागणार?”, उद्धव ठाकरेंचा सवाल

| Updated on: Aug 20, 2022 | 7:17 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्प फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.

Uddhav Thackeray: फडणवीसजी, तुम्ही सत्तेत आहात आता कुणाचा राजीनामा मागणार?, उद्धव ठाकरेंचा सवाल
Follow us on

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून त्यांनी फडणवीसांना (Devendra Fadnavis) सवाल केलाय. “पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच वंदना बुधर हिच्या जुळ्या मुलांचा मृत्यू गंभीर आहे. नुसत्या थातूरमातूर चौकशीचे आदेश देऊन भागणार नाही. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी 25 हजार 1826 कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या गेल्या. त्यात सार्वजनिक आरोग्य 2259, महिला व बाल विकास 1672, सामाजिक न्याय विकास सहाय्य 2673, आझादीचा अमृत महोत्सव 500 असे सर्व कोटीतले आकडे आहेत. शिवाय रस्त्यांसाठी शेकडो कोटींचे वेगळे आकडे असतानाही वंदना बुधरने आपली जुळी मुले गमावली आहेत. कारण या पैशांचा विनियोग जनतेसाठी नाही तर आमदार-खासदारांना खोकी देण्यासाठी सुरू आहे. खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले. फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार?”, असं सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला काय झाले आहे? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयास पडला आहे. प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेस लकवा मारला आहे. सध्या मुसळधार पाऊस, महाप्रलय वगैर चिंतेचे वातावरण म्हणजे अस्मानी संकट आहे, पण लकवा मारलेली आरोग्य व्यवस्था म्हणजे फडणवीस-शिंदे गट सरकारची सुलतानी आहे.. ठाण्याजवळच्या ‘मोखाडा’, ‘वाडा’ अशा आदिवासी भागांतील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे महाराष्ट्राला लाज आणणारे आहेत. दोन घटनांनी तर व्यवस्थेची पोलखोलच केली.

हे सुद्धा वाचा

ठाण्याजवळील मोखाडा तालुक्यात बोटोशी हे अतिदुर्गम गाव आहे. तेथील मरकट वाडीत वंदना बुधर या आदिवासी महिलेस जुळे झाले. बाळंतपणात काही अडचणी निर्माण झाल्या, पण गावात ना वाहन ना सरकारी आरोग्य केंद्र. उपचारांची आबाळ झाली. वंदनास प्रचंड रक्तस्राव सुरू झाल्याने मोखाडय़ातील डॉक्टरकडे नेण्याचे गावकऱ्यांनी ठरवले, पण दवाखान्यात नेण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे तिला ‘डोली’तून तीन किलोमीटर मुख्य रस्त्यावर आणले. तोपर्यंत वेळ निघून गेली. वंदनाची जुळी मुले त्या मुसळधार पावसात डोलीतच मृत झाली. एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू होता आणि महाराष्ट्रातील आदिवासी पाडे अशा पारतंत्र्याच्या अंधारात आपल्याच आप्तांचे मृत्यू उघडय़ा डोळय़ाने पाहत होते. हे झाले मोखाडय़ाचे प्रकरण. बाजूच्या वाडा तालुक्यातही तेच घडले. येथील पाचघर गावाला जाण्यासाठी पक्का सोडा, पण साधा रस्ता नाही. त्यात पावसाने ती पायवाटही नष्ट केली. 15 ऑगस्टला एका आदिवासी महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या. गावात धावाधाव सुरू झाली… गावात एकमेव जीप गाडी होती ती बाहेर काढण्यात आली. पण रस्त्याचा साफ चिखल झाल्याने त्या जीपला दोन तास धक्के मारीत जीप मुख्य रस्त्यापर्यंत आणावी लागली. मोखाडय़ाप्रमाणे हा भागही शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीचा आहे. महाराष्ट्रातील या अमानुष प्रकारांची दखल उच्च न्यायालयाने घेतली व सरकारला फटकारले.