Saamana: “बेरोजगारांना राष्ट्रसेवक म्हणायचं,भरतीच्या वेळी अपमान करायचा, उपाशी-तापाशी’वंदे मातरम्’चे नारे द्यायला लावायचं,बेशरमपणाचा कळस झालाय!”, सामनातून टीकास्त्र

| Updated on: Aug 18, 2022 | 7:07 AM

Saamana Editorial: सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपच्या मनसुब्यांवर टीका करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अग्नीवीर योजनेवरून सरकारला धारेवर धरण्यात आलं आहे.

Saamana: बेरोजगारांना राष्ट्रसेवक म्हणायचं,भरतीच्या वेळी अपमान करायचा, उपाशी-तापाशीवंदे मातरम्चे नारे द्यायला लावायचं,बेशरमपणाचा कळस झालाय!, सामनातून टीकास्त्र
Follow us on

मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) आज भाजपच्या मनसुब्यांवर टीका करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अग्नीवीर योजनेवरून (Agniveer Yojana) सरकारला धारेवर धरण्यात आलं आहे. “एकीकडे अग्निवीर-अग्निवीर म्हणून बेरोजगार तरुणांना राष्ट्रसेवक वगैरे म्हणायचे आणि दुसरीकडे ते भरतीसाठी आले की, त्यांचा अपमान करायचा. उपाशी-तापाशी लोकांना ‘वंदे मातरम्’चे नारे द्यायला लावायचे. हे धंदे बंद करा. बेकायदेशीर, घटनाद्रोही कृत्यांची लाज बाळगा. जिथे तिरंगा फडकवायचा तिथे हातभर शेपटा घालून आपल्या मोहल्ल्यांत तिरंगा यात्रा काढायच्या हे ढोंग आहे. राष्ट्रभक्तीचा असा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे”, असं सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

सामनातून टीकास्त्र

आझादीच्या अमृत महोत्सवाचा राजकीय उत्सव संपला असेल तर सरकारने देशाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बरेच काही बोलून गेले. त्यांचे भाषण राजकीय प्रचारकी थाटाचे होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी त्यांनी लाल किल्ल्यावरून केली. पंतप्रधानांचे भाषण संपले आणि इकडे महाराष्ट्रात ‘अग्निवीर’ योजनेची पोलखोल झाली. संभाजीनगरात अग्निवीर भरतीसाठी हजारो बेरोजगार तरुण आले. त्यांना दिवस-रात्र अन्न-पाण्याशिवाय तळमळत रस्त्यावरच राहावे लागले. ‘अग्निवीर’ हे आपल्या देशाचे भाग्यविधाते, राष्ट्रसेवक वगैरे असल्याचे पंतप्रधानांकडून सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात अग्निवीरांची अवस्था भिकाऱ्याहून भिकाऱ्यासारखी केल्याचे महाराष्ट्रात पाहायला मिळाले. विकसित हिंदुस्थानसाठी हेच पंचप्राण असतील तर कसे व्हायचे? बेरोजगार तरुणांची सैन्यभरतीच्या नावाखाली अशी थट्टा जगाच्या पाठीवर कोठेच झाली नसेल.

मुळात बेरोजगारांना गुलाम व लाचार बनविण्यासाठी ‘अग्निवीर’ ही योजना आहे व महाराष्ट्रात याचे बिंग फुटले. अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांना कोणी साधे पाणीही विचारले नाही. पण झुंडीच्या झुंडी गोळा करून त्यांना भ्रमित करायचे, धर्माची अफू त्यांच्या डोक्यात कोंबायची व त्याच नशेत ठेवून निवडणुका जिंकायच्या हेच ज्यांचे ‘पंचप्राण’ आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करायची? महाराष्ट्रात महाप्रलयाने थैमान घातले. लोकांचे संसार वाहून गेले. पण फक्त ‘वंदे मातरम्’ म्हणा, महाप्रलय संपून जाईल, अशा बेताल राष्ट्रभक्तीने लोकांचे जगण्या-मरणाचे प्रश्न संपणार आहेत काय? भाजपच्या मंत्र्यांनी अशा प्रकारे ‘वंदे मातरम्’चा फतवा काढून राजकारण करणे हा स्वातंत्र्य आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शेकडो क्रांतिवीरांचा अपमान आहे. पंतप्रधानांपासून भाजपच्या आजच्या पिढीपर्यंत एकही जण स्वातंत्र्य आंदोलनात नव्हता. हे सत्य पंतप्रधान मोदी यांनीच लाल किल्ल्यावरून मान्य केले. स्वातंत्र्यानंतर जन्मास आलेला मी पंतप्रधान असल्याचे ते म्हणतात. मग तुम्ही स्वातंत्र्याचा इतिहास का बदलत आहात? भारतीय जनता पक्षाला दिला कोणी? ‘घर घर तिरंगा’ वगैरे राजकीय मोहिमा ठीक आहेत, पण देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या कार्यालयांवर व घरांवर तिरंगा फडकविण्यास नकार देणारे आज ‘घर घर तिरंग्या’च्या मोहिमा राबवताना दिसले. हे आश्चर्यच नाही काय? ‘घर घर तिरंगा’ फडकवायची इतकीच देशभक्ती व मर्दानगी होती तर पाकव्याप्त कश्मीरमधील घराघरावर तिरंगा फडकवून आझादीचा अमृत महोत्सव हिमतीने साजरा करायला हवा होता.

हे सुद्धा वाचा

मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू, इंदिरा गांधी अशी स्वातंत्र्यसमरातील घराणेशाही तुमच्याकडे असेल तर दाखवा. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे अशी महाराष्ट्र स्वाभिमानाची तरी घराणेशाही तुम्ही दाखवू शकता काय? लोकांना देशभक्तीच्या नावाखाली रस्त्यावर भिकाऱ्यासारखे उभे करायचे. एकीकडे अग्निवीर अग्निवीर म्हणून बेरोजगार तरुणांना राष्ट्रसेवक वगैरे म्हणायचे आणि दुसरीकडे ते भरतीसाठी आले की, त्यांचा अपमान करायचा. उपाशी-तापाशी लोकांना ‘वंदे मातरम्’चे नारे द्यायला लावायचे. हे धंदे बंद करा. बेकायदेशीर, घटनाद्रोही कृत्यांची लाज बाळगा. जिथे तिरंगा फडकवायचा तिथे हातभर शेपटा घालून आपल्या मोहल्ल्यांत तिरंगा यात्रा काढायच्या हे ढोंग आहे. राष्ट्रभक्तीचा असा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे.