उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधवांना ‘तो’ शब्द दिला असावा : सामना

| Updated on: Jan 02, 2020 | 8:03 AM

आमदार भास्कर जाधव यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र मिळून राज्य घडवू, असा शब्द दिला असावा, असं 'सामना'त म्हटलं आहे

उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधवांना तो शब्द दिला असावा : सामना
Follow us on

मुंबई : ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कुठे आनंदलहरी उमटल्या आहेत, तर कुठे नाराजीच्या लाटा वाहत आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नाराजीनाट्यावर ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलेलं आहे. गुहागरचे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदाचा शब्द दिला नसावा, मात्र एकत्र मिळून राज्य घडवू, असा शब्द त्यांनी नक्कीच दिला असावा, असं ‘सामना’त म्हटलं आहे (Saamana on Bhaskar Jadhav).

प्रत्येक मंत्रिमंडळ विस्तारानंतर असंतोषाच्या अशा वावटळी उठतच असतात, ठिणग्या उडतच असतात. आधीचे फडणवीस सरकारही या फेऱ्यातून सुटले नव्हते. राज्य मंत्रिमंडळचा विस्तार हा काही जणांसाठी आनंदवार्ता असली तरी हायकमांडसाठी डोकेदुखी ठरत असते. तरी बरे ठाकरे सरकारने विस्तारात सगळ्या जागा भरल्या. दोन-चार जागा शेवटपर्यंत शिल्लक ठेवून नाराजांना गुळ- खोबऱ्याचा नैवैद्य दाखवत राहायचे हे धंदे मुख्यमंत्र्यांनी केले नाहीत. एक मजबूत आणि अनुभवी मंत्रीमंडळ सत्तेवर आले. त्यांना काम करु द्या, असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचं काही म्हणणं मांडलं आहे. ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आणि येताना उद्धव ठाकरे यांनी काही शब्द दिल्याचं ते म्हणतात. पण आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी ‘मंत्री करतो’ असा शब्द दिल्याची माहिती नाही. शिवसेना परिवारात सामील व्हा, एकत्र मिळून राज्य घडवू, असा शब्द त्यांनी नक्कीच दिला असावा, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा : “युतीच्या काळात हातात चिमण्या मारण्याची बंदूक, आघाडीने थेट बॉम्बच दिला”

बच्चू कडू, शंकरराव गडाख आणि येड्रावकर या शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या तीन अपक्ष आमदारांना दिलेला शब्द पाळल्याचं दिसलंच आहे. मंत्रिमंडळ तीन पक्षांचं असल्यामुळे शब्द देण्यावर मर्यादा होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ‘पाठिंबा’ देणाऱ्या घटकपक्षांवर मेहेरनजर केल्याचं दिसत नाही, असं म्हणत शेकाप आणि समाजवादी पक्षाला लावलेल्या वाटाण्याच्या अक्षतांवरुन कानपिचक्या लगावण्यात आल्या आहेत.

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नाराजीनंतर रंगलेल्या घडामोडींवरही ‘सामना’तून टिपण्णी करण्यात आली आहे. संग्राम थोपटे समर्थकांनी केलेल्या राड्यावरुन सामनात टीका करण्यात आली आहे. तर  महसूल खात्यावरुन अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यात सुरु असलेल्या रस्सीखेचचाही उल्लेख करण्यात आला आहे.

Saamana on Bhaskar Jadhav