Sadabhau Khot : ‘बारामतीला जाऊन फुकट जेवण केलंय, ते बिलही भीक मागून भागव’, राजू शेट्टींच्या टीकेला सदाभाऊंचं खोचक उत्तर

| Updated on: Jun 19, 2022 | 6:58 PM

बारामतीला जाऊन तू फुकट जेवण करुन आलाय, आमरस खाऊन आलाय, ते बारामतीचं बिलही भागवायचं राहिलं आहे ते ही भीक मागुन भागव. कारण तुझं आयुष्य डब्यातून पैसे गोळा करण्यातच गेलं आहे.

Sadabhau Khot : बारामतीला जाऊन फुकट जेवण केलंय, ते बिलही भीक मागून भागव, राजू शेट्टींच्या टीकेला सदाभाऊंचं खोचक उत्तर
सदाभाऊ खोत, राजू शेट्टी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) सध्या एका व्हिडीओमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. सदाभाऊ सांगोला दौऱ्यावर असताना एका हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला आणि सगळ्यांसमोर त्याने 2014 मधील उधारीची (Hotel Bill) मागणी सदाभाऊंकडे केली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. त्यानंतर सदाभाऊ यांनी तो हॉटेल मालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर खोत यांनी आज हॉटेल मालकाने केलेल आरोप कसे खोटे आहेत हे 2014 च्या निवडणुकीच्या काही तारखा आणि कागदपत्रांद्वारे सांगितलं आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी या प्रकारावरुन सदाभाऊंवर जोरदार टीका केली होती. खोत यांनी आज शेट्टी यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलंय.

‘ते बारामतीचं बिलही भागवायचं राहिलं आहे, ते ही भीक मागुन भागव’

सदाभाऊ खोत म्हणाले की, आमचे एक महान नेते 128 शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माझे सहकारी म्हणाले हा माझा स्वाभिमानीचा कार्यकर्ता आहे. अरे त्याच्या छातीवरील बिल्ला गेला कुठे? डिजिटलचं स्वागत राष्ट्रवादीचं करतोय, कार्यक्रमात तो राष्ट्रवादीच्या आहे, राष्ट्रवादीचा नेता म्हणून तो डिजिटल लावतोय आणि आमचा शेतकरी नेता म्हणतो तो माझा स्वाभिमानीचा कार्यकर्ता आहे. त्याचं बिल मी भीक मागून देणार. त्या नेत्यालाही मी सांगतो, बारामतीला जाऊन तू फुकट जेवण करुन आलाय, आमरस खाऊन आलाय, ते बारामतीचं बिलही भागवायचं राहिलं आहे ते ही भीक मागुन भागव. कारण तुझं आयुष्य डब्यातून पैसे गोळा करण्यातच गेलं आहे. त्यामुळं मला त्याकडे फार जायचं नाही. पण राजकारणाची पोळी तापलेल्या तव्यावर भाजण्याचं काम सगळी मंडळी करत आहेत.

हॉटेल मालकाला राष्ट्रवादीनं स्क्रिप्ट दिली

खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केलीय. ’15 एप्रिलला निवडणूक प्रचार संपला, 17 एप्रिलला मतदान झालं… तरी सुद्धा हा बहाद्दर 25 दिवस कार्यकर्त्यांना जेवायला देत होता का? महाराष्ट्रात असता कोणता लोकप्रतिनिधी आहे जो निवडणूक संपल्यानंतर महिनाभर कार्यकर्त्यांच्या जेवणावळी उठवतो. ज्या कागदावर त्याने टिपण तयार केलं त्या कागदाला ९ वर्षे होत आलं तरी घडी पडलेली नव्हती. आता मला प्रश्न हा पडतो. 9 वर्षे हा माणूस काही बोलला नाही. 9 वर्षानंतर ज्या तारखा त्यानं सांगितल्या त्या मतदान झाल्यानंतरच्या तारखा येतात. मग मतदान झाल्यानंतरच्या तारख्या तयार करताना राष्ट्रवादीच्या नेत्यानं त्याला लिहून देताना किमान मतदान कधी झालं ते तरी बघायला हवं होतं. कारण 17 एप्रिलला माढा लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं होतं.

निवडणूक झाल्यानंतर 15 दिवसांनी सदाभाऊला फोन केला की माझं बिल द्या. सदाभाऊ म्हणाले मी आता आमदार, मंत्री आहे. माझ्या पीएला फोन करा. काय महाशय.. मी आमदार मंत्री झालो सव्वा दोन वर्षानं. 2016 ला मी आमदार आणि मंत्री झालो. म्हणजे त्याही ठिकाणी तो स्पष्टपणे खोटं बोलला आहे.

टोमॅटोसारख्या गालाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यानं कुभांड रचलं

राष्ट्रवादीनं कुभांड रचलं. कारण थेट माझ्या अंगावर यावं तर राष्ट्रवादीचा हल्ला झाला तर राष्ट्रवादीची नाचक्की होईल. मग एक प्लानिंग ठरलं. या हॉटेलवाल्यानं तिथं याचचं, मला अडवायचं, माझ्यावर बोलत राहायचं. मग माझ्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली तर माझ्यावर खुनी हल्ला करायचा. हा ठरलेला प्लॅन होता. पण तो सक्सेस होऊ शकला नाही. आज त्याचं पितळ उघडं पडलं. मी तिथं बोललं होतो की टोमॅटोसारख्या गालाच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा याला पाठिंबा आहे. त्या नेत्यानं हा प्लॅन तयार केलाय. तो टोमॅटोसारख्या गालाचा कोण हे आता स्पष्ट झालेलं आहे. मी मंत्री असतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला होता. सोलापुरातही माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला.

‘आमचा आवाज दाबणार असाल तर शांत बसणार नाही’

इतक्याच तुमच्या नाकाला मिरच्या झोंबत आहेत तर मग करा ना शेतकऱ्यांना मदत. त्यावर आम्ही बोलणारच. पण आम्ही बोलत असताना अशाप्रकारे कटकारस्थानं रचून आमचा आवाज दाबणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही. जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा आंदोलनावेळी माझ्यावर हल्ला झाला तेव्हा मी बोललो होतो की हे सरकार मला एखाद्या खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी अनेकांनी विचारलं की कोणत्या केसेसमध्ये अडकवणार. त्याचा आज ढळढळीत उदाहरण समोर आलं आहे.

मी राष्ट्रवादीला सांगू इच्छितो की तुमच्या पक्ष सर्वसामान्यांनाचा पक्ष नाही. तुमचा पक्ष ठेकेदारांचा पक्ष आहे. तुमचा पक्ष चिरेबंदी वाड्यात राहणाऱ्यांचा पक्ष आहे. तुमचे वाडे आम्ही उद्ध्वस्त करणारच. कारण ही आमची लढाई गावगाडा विरुद्ध वाडा अशी आहे. प्रस्तापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. हा लढा आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. तुम्ही कितीही कटकारस्थानं करा आम्ही भीक घालणार नाही.