…तर मी राजीनामा दिला असता, संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांना डिवचलं

| Updated on: Jan 28, 2021 | 11:20 AM

धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून, तर आदित्य ठाकरे वरळीतून निवडून यावेत, म्हणून शिवसेना-काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी फिक्सिंग झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप संभाजी पाटील निलंगेकरांनी केला (Sambhaji Patil Nilangekar Amit Deshmukh)

...तर मी राजीनामा दिला असता, संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांना डिवचलं
Follow us on

लातूर : ‘नोटा’ विरोधात निवडून आलो असतो, तर मी लगेच राजीनामा दिला असता, असं म्हणत भाजप नेते आणि लातूरमधील माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर  (Sambhaji Patil Nilangekar) यांनी थेट सांस्कृतिक मंत्री आणि काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना डिवचलं. अमित देशमुख यांचे धाकटे बंधू धीरज देशमुख, देवेंद्र फडणवीस यांचे पीए अभिमन्यू पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी तीन पक्षांचे राजकीय फिक्सिंग झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप निलंगेकरांनी केला आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख ‘नोटा’विरोधात निवडून आले, त्यावरुन निलंगेकरांनी शरसंधान साधलं. (Sambhaji Patil Nilangekar taunts Amit Deshmukh Dhiraj Deshmukh winning Latur Rural against NOTA)

“फिक्सिंग करणारे हाय लेव्हलचे नेते”

“लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला सोडली, तेव्हा मला वेदना झाल्या, एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे माझ्या डोळ्यातून पाणी आल्याचं सर्वांनी पाहिलं असेल. ती जागा फिक्सिंग झाली होती. मतदारांना वेड्यात काढल्याचं जेव्हा मी ऐकलं, तेव्हा अधिक वेदना झाल्या. कारण जनतेसमोर जाणं, हे लोकशाहीचं गणित आहे. मात्र इथे लोकशाहीचा खून करण्याचं काम झालं. फिक्सिंग करणारे हाय लेव्हलचे नेते होते” असा गंभीर आरोप निलंगेकरांनी केला.

“कराड विधानसभेवर आले असते, तर अधिक आनंद”

“निवडणुकीच्या मैदानात लढले असते, तरी जनतेला समाधान वाटलं असतं. मात्र मागच्या दाराने केलेल्या गोष्टी कोणाच्या पचनी पडणार नाहीत. या प्रकाराला जाहीर विरोध करणारा महाराष्ट्रात मी एकमेव व्यक्ती होतो. भाजप नेते रमेश कराड हे विधानपरिषदेऐवजी विधानसभेचे आमदार झाले असते, तर मला अधिक बरं वाटलं असतं. कोणाला दोष देण्याचा माझा स्वभाव नाही, त्यामुळे मीच कमी पडलो, असं म्हणेन” असंही निलंगेकर म्हणाले.

“…तर मी राजीनामा दिला असता”

“मुंबईतील एका जागेसाठी फिक्सिंग झाली. नोटाविरोधात जिंकलेली महाराष्ट्रातील ही एकमेव जागा होती. याला विजयी होणं म्हणतच नाहीत. माझ्यासारखा माणूस असता ना, नोटाच्या विरोधात जिंकलो म्हणणारा, लगेच राजीनामा दिला असता. लढून, लोकांच्या विश्वासात येऊन जिंकलो असतो” असंही संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. (Sambhaji Patil Nilangekar taunts Amit Deshmukh Dhiraj Deshmukh winning Latur Rural against NOTA)

‘नोटा’ला तब्बल 28 हजार मतदान

लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस उमेदवार (धीरज देशमुख) वरळीत राहतात. त्यांचं सतत मुंबईला येणं-जाणं असतं. लातुरातील सामान्य माणसालाही हे माहित आहे. काँग्रेस उमेदवाराला ‘नोटा’ला तब्बल 28 हजार मतदान विचारा, तुम्ही कोणाच्या विरोधात निवडून आलात, तर ते सांगतील आम्ही ‘नोटा’च्या विरोधात निवडून आलो. कारण ‘नोटा’ला तब्बल 28 हजार मतदान झालं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान झालं, याकडे निलंगेकरांनी लक्ष वेधलं. हा काही दुबळा मतदारसंघही नाही. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसच्या विरोधात आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगर पंचायती भाजपकडे आहेत. मग शिवसेनेने त्याच जागेचा आग्रह का केला, असा सवाल संभाजी पाटील निलंगेकरांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या :

निलंगेकर म्हणतात, लातुरात लोकशाहीचा खून! ठाकरे, फडणवीस, देशमुखांकडे अप्रत्यक्ष बोट, राजकीय ‘फिक्सिंग’चा गौप्यस्फोट !

त्यावेळी भाजप नेते रमेश कराड शिवबंधन बांधणार होते, पण…. निलंगेकरांचा दावा

(Sambhaji Patil Nilangekar taunts Amit Deshmukh Dhiraj Deshmukh winning Latur Rural against NOTA)