महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असणारा व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमावा, संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे मागणी

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आज ट्विट करीत एकप्रकारे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची व याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केलीय.

महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असणारा व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमावा, संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे मागणी
संभाजीराजे छत्रपती, भगतसिंह कोश्यारी
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 30, 2022 | 6:10 PM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यावरुन विरोधकांकडून राज्यपालांवर (Governor) जोरदार टीका सुरु झालीय. कोश्यारी यांनी मुंबई बाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आज ट्विट करीत एकप्रकारे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची व याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केलीय.

‘एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करा’

विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत.

त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा.

राज्यपाल कोश्यारींचं नेमकं वक्तव्य काय?

शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, ते एका राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात बोलत होते. मुंबईमधून जर गुजराती आणि राजस्थानी समाज काढून टाकला तर मुंबई, ठाणे आणि त्या परिसरात पैसा उरणार नाही. मुंबईची ओळख आर्थिक राजधानी अशी आहे, ती ओळख पुसली जाईल असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते.  त्यांच्या या वक्त्यावर आता स्वपक्षातील नेत्यांसह विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.