…म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Feb 28, 2021 | 4:33 PM

विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे पदावरुन पायउतार झाल्याचं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं (Sanjay Rathod first reaction Resignation)

...म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया
संजय राठोड, शिवसेना आमदार
Follow us on

मुंबई : आमदारकीचा राजीनामा दिला नाही, फक्त मंत्रिपद सोडलं, असं शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट केलं, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे, परंतु विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे पदावरुन पायउतार झाल्याचं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. (Sanjay Rathod first reaction after Resignation)

संजय राठोड काय म्हणाले?

“मी माझा राजीनामा मा. मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. आमच्या बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. मात्र अनेक दिवसांपासून  विरोधी पक्षांनी प्रसारमाध्यम, समाज माध्यमातून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मीडियातून माझ्या समाजाची, माझी वैयक्तिक  बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार घडला. गेली तीस वर्ष मी केलेलं राजकीय आणि सामाजिक काम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे. याचा तपास व्हावा, मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावं, ही माझी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना हे सांगून मी राजीनामा दिला” अशी पहिली प्रतिक्रिया संजय राठोड यांनी राजीनाम्यानंतर दिली.

आमदारकीचा राजीनामा नाही

“माझ्यासोबत अनिल परब, अनिल देसाई होते, मी सध्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आमदारकीचा राजीनामा दिला नाही. चौकशीनंतर परिणाम भोगायला पाहिजे होते, परंतु विरोधकांनी उद्या अधिवेशन चालू देणार नाही, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे, परंतु विरोधी पक्षांनी संसदीय कार्य चालू देणार नाही, असं म्हटलं, म्हणून पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला” असंही संजय राठोड यांनी सांगितलं.

वर्षा बंगल्यावर काय घडलं?

दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास एकनाथ शिंदे यांनी विरोध केला. राठोड यांनी पोहरादेवीच्या महंतांशी बोलण्याची विनंती केली, परंतु मुख्यमंत्र्यांनी चर्चेला नकार दिला. मला माझा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती.

सपत्नीक भेटण्यामागे कारण काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राठोड यांनी आपला राजीनामा सादर केला. संजय राठोड यांनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. पूजा चव्हाण प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं राठोड हे पत्नीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? अशी शक्यताही वर्तवली जात होती.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय?

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी बसवली जाण्याची चिन्हं आहेत. यानुसार संजय राठोड यांचीही चौकशी केली जाईल. राठोड दोषी आढळल्यास त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

वनमंत्रिपद कोणाला?

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील त्याच मंत्र्याकडे जाईल. मंत्रिमंडळ विस्तारात वनमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्याचं नाव निश्चित करतील, त्यालाच वनमंत्री पदाची लॉटरी लागेल. शिवसेनेत लॉबिंग चालत नाही, असं म्हटलं जातं. पण वनमंत्रिपद मिळावं यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचं कळत आहे. तर मुंबई-ठाण्यातील आमदारही वनमंत्रीपद मिळेल का यासाठी प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (Sanjay Rathod first reaction after Resignation)

आमदारकीच्या राजीनाम्याचीही चर्चा

संजय राठोड मंत्रिपदासोबत आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राठोड पुन्हा निवडणुकीला सामोरे जातील. त्यातून जनता आणि समाज आपल्याच पाठीशी असल्याचंही दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तसेच पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात परतण्याचा मार्गही मोकळा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अडचणी कोणत्या?

संजय राठोड यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यास त्यांना पुन्हा तिकीट देण्यास शिवसेनेकडूनच विरोध होऊ शकतो. पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर मलीन झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची प्रतिमा आणखी मलीन होऊ नये म्हणून राठोड यांना तिकीट देण्यास शिवसेनेतून विरोध होऊ शकतो, असंही सूत्रांनी सांगितलं.

महंत राठोडांच्या पाठीशी

दरम्यान, पोहरादेवीच्या महंतांनी पुन्हा एकदा राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही चौकशीशिवाय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, असं आवाहन महंतांनी मुख्यमंत्र्यांकडे केलं होतं.

संबंधित बातम्या :

संजय राठोडांच्या ‘त्या’ 10 चुका ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला

ठाकरे मंत्रिमंडळातील पहिली विकेट, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

राजीनामा दिला तो स्वीकारतील का नाही अजून माहित नाही, फडणवीस अजूनही सरकारवर साशंक

(Sanjay Rathod first reaction after Resignation)