उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही : संजय राऊत

| Updated on: May 10, 2020 | 3:38 PM

विधानपरिषदेच्या निवडणुकीत किती जागा लढवायच्या या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा चढला आहे (Sanjay Raut comment on MLC Poll).

उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही : संजय राऊत
Follow us on

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत किती जागा लढवायच्या या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा चढला आहे (Sanjay Raut comment on MLC Poll). कुणी किती जागा लढवायचा यावरुन सत्ताधारी महाविकासआघाडीत तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिनविरोध निवडणुकीसाठी आग्रही असताना काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याने मोठा पेच तयार झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला अल्टीमेटम दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

संजय राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन कुणी किती जागा लढवायच्या कसं पुढं जायचं यावर अजुनही चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक रिंगणात असल्यामुळे चर्चेला थोडा वेगळा रंग येऊ शकतो. काँग्रेसकडे त्यांचा दुसरा उमेदवार निवडून आणण्याइतपत मतं नाही, त्यांचे 44 आमदार आहेत असं आपण म्हणतो. मात्र, भाजपकडे देखील त्यांचा चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक मतं नाहीत. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमची इच्छा आहे की महाराष्ट्रात ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ते गरजेचं असून उद्धव ठाकरे यांची ती इच्छा आहे. या एका निवडणुकीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार मुंबईला बोलवावे लागतील. त्यासाठी एक दिवस अधिवेशन घ्यावं लागेल, मग निवडणूक घ्यावी लागेल. हे चित्र महाराष्ट्रात आणि देशात चांगलं जाणार नाही. आम्हाला पूर्ण खात्री आहे ही निवडणूक बिनविरोधच होईल.”

“लोकं पायीपायी घरी चालले आहेत, लोकं घरामध्ये बंद आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. अशावेळी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकमताने एक निवडणूक घेऊ शकत नाही हे महाराष्ट्राच्या परंपरेला कलंक लावणारं चित्र असेल. उद्धव ठाकरे यांना अशाप्रकारच्या राजकारणात कधीही रस नव्हता आणि नाही. ते या सर्व प्रकारामुळे अस्वस्थ आहेत. ही निवडणूक बिनविरोध झाली तरच लढावी अशी त्यांची इच्छा आहे. निवडणुका लढायला आम्ही घाबरत नाही. पण ही वेळ निवडणुका लढण्याची नाही. सध्याची वेळ कोरोनाची परिस्थिती हाताळण्याची आहे. आपण नाईलाज म्हणून ही निवडणूक घेत आहोत. राज्य अस्थिर होऊ नये म्हणून आम्ही स्वतः पंतप्रधानांशी चर्चा करुन ही निवडणूक घेत आहोत. याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

भाजप प्रमुख विरोधीपक्ष आहे. तो कालपर्यंत सत्ताधारी होता. निवडणूक बिनविरोध व्हावी ही त्यांचीही तितकीच जबाबदारी आहे. चौथ्या जागेसाठी त्यांच्याकडे मतं कमी आहेत, तर त्यांनाही घोडेबाजारातील काही गाढवं विकत घ्यावी लागतील. हे चित्र कोरोनाच्या परिस्थिती योग्य नाही. त्यांनी देखील कोरोनाच्या या स्थितीत महाराष्ट्रावर ही निवडणूक लादायची का हा विचार केला पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाने एकत्र येऊन या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेसच्या नेत्यांशी आमची चर्चा सुरु आहे. मात्र, काँग्रेस किंवा भाजप या दोघांकडेही त्यांचा अधिकचा एक उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक मतं नाही, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

MLC Polls | असंच चालू राहिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही, उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला निरोप : सूत्र

MLC Polls | विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागा, दहा उमेदवार, कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट?

MLC Polls | विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार जाहीर

Sanjay Raut comment on MLC Poll