Sanjay Raut ED Custody : ‘सूड नाही तर सडेतोड चौकशी सुरु, उद्धवजी तुम्ही भ्रष्टाचार लपवू नका’, आशिष शेलारांचा हल्लाबोल

सुड नाही तर सडेतोड चौकशी सुरु आहे. उद्धवजी तुम्ही भ्रष्टाचार (Corruption) लपवू नका. गमछे फिरवण्याचा निर्लज्जपणा बंद करा. सामान्य मराठी मुंबईकरांच्या स्वप्नांचा चुराडा तुम्ही करता, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवलाय.

Sanjay Raut ED Custody : सूड नाही तर सडेतोड चौकशी सुरु, उद्धवजी तुम्ही भ्रष्टाचार लपवू नका, आशिष शेलारांचा हल्लाबोल
संजय राऊत, आशिष शेलार
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Aug 01, 2022 | 9:27 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर ईडीनं अटक केलीय. सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी (ED Custody) सुनावण्यात आली आहे. राऊतांवरील कारवाईनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय. तसंच भाजपवरही जोरदार टीका करण्यात येतेय. त्या टीकेला भाजप नेतेही प्रत्युत्तर देत आहेत. सुड नाही तर सडेतोड चौकशी सुरु आहे. उद्धवजी तुम्ही भ्रष्टाचार (Corruption) लपवू नका. गमछे फिरवण्याचा निर्लज्जपणा बंद करा. सामान्य मराठी मुंबईकरांच्या स्वप्नांचा चुराडा तुम्ही करता, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवलाय.

आशिष शेलार म्हणाले की, या सगळ्या भ्रष्टाचारातून माहिमला फ्लॅट, जमिनी, दादरला घर, सरकारी जागेचा अपव्यय सुरु आहे. अनधिकृतरित्या तिसऱ्या माणसाचा अधिकार उभा केला. 650 मराठी माणसांना बेघर केलं. 1 हजार कोटी रुपयांचा अपहार केला. राज्यपालांच्या विरोधात आम्ही सर्वात आधी विरोधात भूमिका घेतली होती. मराठी माणसांच्या इमारती धोकादायक, चाळीत मराठी माणसांना त्रास देण्याचं काम तुमच्या शिवसेनेनं केलं. त्यांना घराबाहेर काढायचं काम तुम्ही केलं. आज मी सगळं काही सांगणार नाही. माझ्या 9 आरोपांना उद्धव ठाकरे यांनी किंवा शिवसेनेतील कुणीही उत्तर द्यावं. त्यावर मी नंतर बोलेन, असं थेट आव्हानच आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिलंय.

दिवस फिरले तर… उद्धव ठाकरेंचा इशारा

उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा वंश कुठून सुरू होतो हे पाहावे लागेल. दिवस सारखे राहत नाहीत. दिवस येतात आणि जातात. काळ सारखाच राहत नाही. नंतर जे लोक येतील ते तुमच्यासारखेच वागले तर काय होईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची, हिंदूत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची, राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचं कारस्थान असल्याचा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.

‘भाजपसोबत लढणारा कोणताच राजकीय पक्ष आज शिल्लक नाही’

देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपच राहणार, असं वक्तव्य भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर नड्डा यांचं हे वक्तव्य आल्यानं राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. अशावेळी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नड्डांना थेट उत्तर दिलंय. ‘भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष शिल्लक नाही. कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहेत. महाराष्ट्रात शिवसेना संपणार म्हणतात, पण हे त्यांनी करूनच पाहावं, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलंय.