ईडीचं उत्खनन हडप्पा-मोहेंजोदारोपर्यंत, ईडीच्या नोटीसची वाट पाहतोय, संजय राऊतांचा टोला

| Updated on: Nov 25, 2020 | 11:07 AM

ईडीवाले मोहेंजोदारो हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. काढू द्या, आम्हीही तयार आहोत" असं संजय राऊत म्हणाले.

ईडीचं उत्खनन हडप्पा-मोहेंजोदारोपर्यंत, ईडीच्या नोटीसची वाट पाहतोय, संजय राऊतांचा टोला
Follow us on

मुंबई : “ईडी उत्खनन करत मोहेंजोदारो आणि हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे मला, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) किंवा महाविकास आघाडीतील आणखी प्रमुख नेत्यांना ईडीची नोटीस आली, तर धक्का बसणार नाही” असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. (Sanjay Raut says he is ready for ED Notice)

“प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी स्वतः खुलासा केला आहे, की ज्या प्रकरणाचा तपास ईडी करत आहे, त्याच्याशी सरनाईक कुटुंबाचा काहीही संबंध नाही. मराठी माणसाने महाराष्ट्रात व्यापार उद्योग करणं, हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना खतम करण्याचं धोरण कोणी राबवत असेल, तर हा मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय देऊन उभा राहील” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

“चौकशीला कोणीही घाबरत नाही, घाबरण्याचं कारणच नाही. आता तुम्ही चौकशांना घाबरायला पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा सत्ता आहे, हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे विसरु नका. मला अनेकांनी विचारलं की तुम्हाला ईडीची नोटीस आली का? सध्या आली नाही, पण आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवारांना किंवा अन्य कोणालाही येऊ शकते. शरद पवारांना तर येऊनही गेली. मला असं कळलं की जुनी थडगी उकरण्याचा प्रयत्न, वीस-वीस वर्षांपूर्वीचं उत्खनन सध्या सुरु आहे. ईडीवाले मोहेंजोदारो हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. काढू द्या, आम्हीही तयार आहोत” असं संजय राऊत म्हणाले.

“पत्ते तुम्ही पिसताय, डाव आम्ही उलटवू”

“सत्य बोलणं, पक्षाशी प्रामाणिक राहणं, ही सगळ्यात मोठी चूक सध्या मानली जात आहे. मात्र आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही घाबरत नाही. दहा हजार कोटींचे घोटाळे करुन काही जण देशातून पळून जात आहेत. काहींची संपत्ती एक कोटींवरुन पाच हजार कोटींवर पाच वर्षांत पोहोचते. पण ईडी त्यांची चौकशी करत नाही. मात्र महाराष्ट्रात प्रमुख नेते, त्यांच्या मुलांना दबावात आणले जात आहे. सूडाचे आणि बिनबुडाचे राजकारण सुरु आहे. आज पत्ते तुम्ही पिसताय, डाव आम्ही उलटवू” असा इशाराही राऊतांनी दिला.

“कंगनाने मुंबईला पाकिस्तान म्हटलं, मुंबई पोलिसांना माफिया म्हटलं, त्यांचं समर्थन कोणी करत आहेत का? अशा व्यक्तींना ते घरी असोत, किंवा नसो, कारवाई केली जाईल. भाजप नेत्यांनी जर अशा वक्तव्यांना सहमती व्यक्त केली असेल, तर त्यांच्यावरही कारवाईची गरज आहे. हे देशाचे शत्रू आहेत. माझ्याकडे 100-120 सत्ताधारी नेत्यांची यादी आहे. त्यांची यादी मी ईडी, अर्थ मंत्रालयाला पाठवणार आहे, मग बघतो कोणावर कारवाई करतात” असंही राऊत म्हणाले. (Sanjay Raut says he is ready for ED Notice)

संबंधित बातम्या :

मुंबई-महाराष्ट्रावर धोक्याची टांगती तलवार, कोरोनाचं संकट विसरून चालणार नाही; शिवसेनेचा सल्ला

जेवढ्या चौकशा करायच्या तेवढ्या करा, महाराष्ट्रातही आमची सत्ता आहे हे लक्षात ठेवा; राऊतांचा इशारा

(Sanjay Raut says he is ready for ED Notice)