राष्ट्रीय नेता म्हणून मोदींना आज पर्याय नाही, संजय राऊत यांचं ‘रोखठोक’ विधान

| Updated on: Mar 13, 2022 | 9:22 AM

पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रीय नेता म्हणून नरेंद्र मोदी यांना आज तरी पर्याय नाही, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

राष्ट्रीय नेता म्हणून मोदींना आज पर्याय नाही, संजय राऊत यांचं रोखठोक विधान
शिवसेना नेते संजय राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रीय नेता म्हणून नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना आज तरी पर्याय नाही, असं विधान संजय राऊत (sanjay raut) यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशातील वारे भाजपविरोधी (bjp) वाहत होते. तरीही भाजपास मतदान झाले. कारण मतदार नरेंद्र मोदींकडे देशाचे नेते म्हणून पाहतो व त्यांच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही. मोदी निवडणुकांकडे एक उत्सव म्हणून पाहतात व या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. उत्सवात सामील झालेले लोक मग बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था हे सर्व प्रश्न निवडणुकीपुरते विसरून जातात, असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी मोदींना आज तरी कुणीच पर्याय नसल्याचं म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’मधून हे विधान केलं आहे.

भारतीय जनता पक्ष पाच राज्यांतील विजय साजरा करीत आहे, पण त्यांनी आहे ते फक्त राखले. नवे काय मिळवले? उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये त्यांचे राज्य होते, ते राखले. पंजाबात त्यांचा दारुण पराभव झाला व जेमतेम दोन जागा ते जिंकू शकले. येथे केजरीवाल व ‘आप’समोर नरेंद्र मोदी व शहा टिकू शकले नाहीत, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

गांधी बहीण-भावांसमोर मोठं काम

पंजाबात सत्ताधारी काँग्रेसने स्वतःचा पराभव स्वतःच घडवून आणला. सिद्धूसारख्या अस्थिर मनाच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवून काँग्रेसने स्वतःच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. उत्तराखंडमध्ये हरीश रावत हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारच पराभूत झाले. भारतीय जनता पक्षाचा उत्तराखंडात विजय झाला. पण मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे पराभूत झाले. जिंकलेल्या राज्याचा सेनापतीच पराभूत होतो तसे हे घडले. आता पुढील काळात उत्तराखंडात भाजपविरोधात नाराजी होती. पण हरीश रावत या वृद्ध नेत्याच्या हट्टापुढे बरेच काही गमवावे लागले. आता पुढील काळात जुन्या नेत्यांच्या विळख्यातून काँग्रेसची सुटका करणे हे मोठे काम गांधी बहीण-भावांसमोर आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दिल्ली आणि पंजाब सांभाळण्यात फरक

पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसमधील ‘जी 23’ हा जुन्यांचा गट पुन्हा उसळी मारेल. काँग्रेसचे चांगले होऊ नये अशी प्रार्थना करणारे लोक काँग्रेसमध्येच आहेत. काँग्रेस बरखास्तीचा विचार गांधीजींनी 1947 मध्ये मांडला. तो अमलात आणायची जबाबदारी या ‘जी 23’ वाल्या मंडळींनी घेतलेली दिसते. पंजाब भाजपकडे नव्हते, पण ज्या काँग्रेसकडे ते होते ते त्यांनी गमावले आहे. देशाच्या सीमावर्ती राज्यात ‘आप’सारख्या पक्षाने बहुमत मिळवणे हा राष्ट्रीय पक्षाचा पराभव आहे. अत्यंत संवेदनशील असे हे राज्य. दिल्लीच्या केंद्रशासित राज्यावर ‘राज्य’ करणे व पंजाबचा सुभा सांभाळणे यात फरक आहे. दुसरे म्हणजे स्वतः केजरीवाल हे अर्धवट राज्याचे मुख्यमंत्री. त्यांच्याकडे गृह, अर्थ यासारखी खातीच नाहीत. उलट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मान मोठा असेल. त्यांच्या हातात स्वतःचे पोलीस दल असेल. त्याचा गैरवापर दिल्लीच्या राजकारणात होऊ नये इतकेच, असं त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

राजकारणात काहीच कायम नसते, अहंकाराची माती होईलच, शिवसेना नेते संजय राऊतांचा हल्ला

VIDEO: आठवलेंचाच पक्ष भाजपच्या दावणीला, ते काय शिवसेनेवर बोलतील?; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

Lockupp Show : “मी 10 वर्षांचा मुलगा असताना माझ्यासोबत छेडछाड झाली” साईशा शिंदेचा मोठा खुलासा