ईडीच्या धाडी, भाजपचे हल्ले, शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली!

| Updated on: Aug 30, 2021 | 5:18 PM

शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणं अपेक्षित आहे. यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड,  राजेश टोपे, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व 16 मंत्र्यांचा समावेश असेल. 

ईडीच्या धाडी, भाजपचे हल्ले, शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली!
sharad pawar
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. उद्या अर्थात मंगळवारी 31 ऑगस्टला ही बैठक होत आहे. उद्या संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या बैठकीत कामकाजाचा आढावा आणि विविध विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटीस, भाजपची नुकतीच झालेली जन आशिर्वाद यात्रा या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला महत्त्व आहे. (Sharad Pawar NCP chief calls party Ministers meeting tomorrow 31st August Mumbai Maharashtra )

शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणं अपेक्षित आहे. यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड,  राजेश टोपे, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व 16 मंत्र्यांचा समावेश असेल.

कोणत्या विषयावर चर्चा अपेक्षित?

शरद पवार हे ठरावीक दिवसांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेत असतात.  प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन केलं जातं. ज्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याची गरज असते त्यांना सूचना दिल्या जातात. त्यामुळे या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.

ईडी नोटीस आणि धाडसत्र  

ईडीने नुकतंच शिवसेना नेते अनिल परब यांना नोटीस पाठवली आहे तर  शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच कार्यालयांवर छापेमारी केली.  जरी हे धाडसत्र शिवसेना नेत्यांवर असलं तरी महाविकास आघाडी म्हणून सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र आहेत. त्यामुळे याबाबत राष्ट्रवादीची भूमिका किंवा रणनीती काय असू शकते त्यावर चर्चा होऊ शकते.

अनिल देशमुख

दुसरीकडे 100 कोटी वसुलीप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आहेत. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या कार्यलयांवर धाडी टाकल्या होत्या. अनिल देशमुखांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणातही राष्ट्रवादी पुढची रणनीती काय आखतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

किरीट सोमय्यांकडून 11 जणांवर आरोप 

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीशी संबंधित 11 जणांवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत 11 जणांची नावं आहेत. या 11 जणांमध्ये राष्ट्रवादीशी संबंधित तिघांचा समावेश आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ आणि अनिल देशमुख यांचा समावेश आहे. याबाबत राष्ट्रवादी उद्याच्या बैठकीत काय चर्चा करते हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या 

ठाकरे सरकारचे ‘घोटाळा इलेव्हन’, रश्मी ठाकरे ते किशोरी पेडणेकर, किरीट सोमय्यांचा आरोप, 11 नावं जाहीर