स्पेशल रिपोर्ट : नितीन गडकरी पराभूत व्हावेत यासाठी खुद्द फडणवीसांचीच रसद? राऊतांच्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पराभूत व्हावेत, यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच रसद पुरवल्याचा गंभीर दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. 'सामना'तून त्यांनी 3 मोठे दावे केले. मात्र राऊतांच्या या दाव्यावरुन नागपुरातीला काँग्रेसच्याच विकास ठाकरेंनी नाराजी वर्तवली.

स्पेशल रिपोर्ट : नितीन गडकरी पराभूत व्हावेत यासाठी खुद्द फडणवीसांचीच रसद? राऊतांच्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
संजय राऊत यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
Chetan Patil | Updated on: May 26, 2024 | 9:34 PM

दैनिक ‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 3 मोठे खळबळजनक दावे केले आहेत. पहिला दावा आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल, दुसरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आणि तिसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल. नागपुरात गडकरी पराभूत व्हावेत, यासाठी भाजपनंच यंत्रणा राबवल्याचा मोठा आरोप राऊतांनी केलाय. “नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नसल्याची खात्री पटल्यावर फडणवीस नाईलाजाने नागपूरच्या प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली, आणि हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात”, असा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय.

संजय राऊत यांच्या याबाबतच्या दाव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलीय. “नितीन गडकरी मागच्या वेळी असे बोलले होते की मी पाच लाखांनी विजय प्राप्त केला तर मी विजयी होईन. मात्र प्रत्यक्षात ते 2 लाखांनीच विजयी झाले. बऱ्याच यंत्रणा या भाजपाच्या नियंत्रणात असतात. त्याच्यावर नियंत्रण न ठेवता गडकरींच्या विरोधात कसं काम करावं? अशाच पद्धतीने या यंत्रणांना निर्देश दिले गेले आहेत. असं नेतृत्व नागपुरातच संपवलं पाहिजे हा प्रयत्न आज नाही तर आधीपासूनच भाजपाकडून सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिलीय. “सनसनाटी पसरवण्याची बातमी आहे. ही राऊतांच्या सुपीक डोक्यातून नापीक आयडीया आहे. संजय राऊत स्वयंसेवक आहेत का? घरी चर्चा केली का? संघ सामाजिक संस्था आहे. गडकरींना माहिती नाही की रसद पुरवली आणि ते राऊतांना माहिती. जीभ दिली आहे म्हणून काहीही बोलण योग्य नाही”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

अनिल देशमुख काय म्हणाले?

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “अनिल देशमुख गडकरींच्या पराभवासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं हे सगळ्या नागपूरला माहिती आहे. राऊत बोलले ते खरे आहे. नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आम्ही आमच्या ताकदीवर एकत्र लढलो यात काही शंका नाही”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.

गिरीश महाजन राऊतांवर संतापले

मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. “संजय राऊत यांचे डोकं तपासावं लागेल. आता तेवढंच राहिलं आहे. 4 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करावं लागेल”, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

काँग्रेसचे विकास ठाकरे राऊतांविरोधात आक्रमक

दुसरीकडे संजय राऊतांच्या या दाव्यामुळे मविआत गडकरींविरोधात लढलेले काँग्रेसचे विकास ठाकरेही आक्रमक झाले आहेत.” संजय राऊत जे बोलत आहेत ते त्यांनी पुराव्याने बोलावं. वायफळ बोलू नये. गडकरींचं त्यांचं काय प्रेम आहे मला माहिती आहे. नागपुरात काँग्रेस सक्षम आहे. आम्ही राऊतांच्या विरोधात खूप काही बोलू शकतो. तुम्ही निवडणुकीत गडकरींची प्रशंशा करत होते. गडकरींसोबत आघाडी करायची होती. संजय राऊतांना नागपूरची ए,बी,सी,डी माहिती नाही”, अशी टीका विकास ठाकरे यांनी केली.

संजय राऊतांचा दुसरा दावा काय?

नितीन गडकरींनंतर योगी आदित्यनाथांबद्दल राऊतांनी दावा केलाय की, जे गडकरींचे तेच योगींचेही झाले. अमित शाहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनीच उत्तर प्रदेशात फिरवल्याचा दावा राऊतांचा आहे.

संजय राऊतांच्या या दाव्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलीय. “शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री होते ते 2-3 खात्याचे मंत्री म्हणून काम करतात, उपमुख्यमंत्रीपद कायदेशीर नाहीच. अशा नेत्यांना केंद्रीय सत्तेला आव्हान निर्माण होऊ नये म्हणून हे सगळं केलं. मोदी, शाह नंतर योगीचा भाजपमध्ये ताकदवान आहेत. योगींचा नामुनीशान राहू नये असे प्रयत्न होऊ शकतात म्हणून मोदी आया तो योगी गया याचा भाजपला युपीत मोठा फटका बसणार आहे”, असा दावा अंबादास दानवे यांनी केला. दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना ठणकावलं आहे. राऊतांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी. संजय राऊत भ्रमिष्ठ झाले आहेत, अशी टीका दरेकरांनी केली आहे.

राऊतांचा तिसरा दावा काय?

राऊतांचा तिसरा दावा होता की, एकनाथ शिंदेंनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान २५ ते ३० कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट होतं. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेते आमदार रविकांत तुपकर यांनी राऊतांच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. “एकनाथ शिंदेंनी खूप पैसे वाटले, उदय सामंत नावेच मंत्री फक्त पैसे वाटायला होते. हजारो कोटींचा वापर एकनाथ शिंदेंनी केला. हेलीकॉप्टरने पैसे वाटले. दादागिरीने राजकारण होत नाही, तसं असतं तर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते. जनता तुम्हाला जागा दाखवणार. शिंदे गटाचा महाराष्ट्रात धुवा निघणार, महाराष्ट्रात माज खपवून घेत नाही”, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

संजय राऊत यांच्या आरोपांवर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “पैसे वाटले हे संजय राऊत पाहायला आला होता का? काही मुर्खासारखे बोलतात. असे पैसे खुजी वाटू शकतो का? महायुतीत कोणताही उमेदवार पडू नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. ते पाठीमागून वार करत नाहीत. पण समोरून वार करतात. बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना महत्त्व देत नाहीत. संजय राऊत यांच्या आरोपात दम नाही, हा आरोप अजित दादांनी केला असता तर त्याला महत्त्व असतं”, असं संजय शिरसाट म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us