अनिलभैयांनी कधी जातीचे राजकारण केले नाही, आता आपण जातीने लक्ष घाला, अहमदनगरच्या शिवसैनिकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Sep 29, 2020 | 4:43 PM

अहमदनगरमधील सावेडीचे शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत सुर्यभान शेळके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्थानिक राजकारणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे

अनिलभैयांनी कधी जातीचे राजकारण केले नाही, आता आपण जातीने लक्ष घाला, अहमदनगरच्या शिवसैनिकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us on

अहमदनगर : अनिलभैयांनी कधी जातीचे राजकारण केले नाही, पण आता अहमदनगर शहरात जातीचे राजकारण सुरु झाले आहे, आपण यात लक्ष घालावे, अन्यथा शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भीती व्यक्त करणार पत्र अहमदनगरमधील शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे. अहमदनगरमधील सावेडीचे शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत सुर्यभान शेळके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्थानिक राजकारणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. (Shivsainik writes letter to CM Uddhav Thackeray asking to review Ahmednagar Politics)

काय आहे पत्र?

अहमदनगरमध्ये गुरुवारी स्वीकृत नगरसेवक भरणार आहे. शिवसेनेत आजपर्यंत मा. स्व. अनिल भैय्या राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही. म्हणून अहमदनगरमध्ये शिवसेना संघटना बळकट राहिली. परंतु काही दिवसापासून जातीचे राजकारण करुन अनिल भैय्या राठोड यांना पराभूत केले होते. आजही स्वीकृत नगरसेवक भरतीवेळी जातीचे राजकारण करुन दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत. तरी आपण यात लक्ष घालावे, अन्यथा शिवसेनेला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी अनिल भैयांना दिलेली श्रद्धांजली

“माझा ज्या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही, अशा अनिलभैया राठोड यांना मला श्रद्धांजली वाहावी लागत आहे. अनिल भैया हा आमचा, शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता. अनेक जण इतर प्रांतातून मुंबई आणि महाराष्ट्रात येतात. रोजी रोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत. अनिल भैया राजस्थानमधून महाराष्ट्रात आले. आधी मुंबई, मंचर आणि तिथेही मन रमेना म्हणून नगरला गेले. ज्यूसचा गाडीवाला माणूस ध्यानीमनी नसताना आमदार आणि मंत्री झाला. शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी काम सुरु केलं. पण विचारांशी बांधिलकी, सक्रीय काम करत हा ढाण्या वाघ, जनतेचा माणूस होऊन काम करत राहिला.” असे उद्धव ठाकरे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले होते.

कोण होते अनिल राठोड?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचे 5 ऑगस्टला निधन झाले. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

अनिल राठोड यांनी अहमदनगर शहर मतदारसंघात सलग 25 वर्ष लोकप्रतिनिधित्व केले होते. शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते. 2009 मध्ये त्यांच्याकडे शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या काळात त्यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपदाची धुरा होती.

सहकार आणि साखरसम्राटांच्या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम राठोड यांनी केले. राठोड यांची ‘मोबाईल नेता’ अशी ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जात ते लोकांचे प्रश्न सोडवत असत. तसेच सर्वत्र ते ‘भैया’ नावाने प्रसिद्ध होते. (Shivsainik writes letter to CM Uddhav Thackeray asking to review Ahmednagar Politics)

अहमदनगर महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी

स्थायी समिती सभापतींच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला होता. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपचे दावेदार मानले जाणाऱ्या मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. इतकंच नाही, तर सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे कोतकर यांची स्थायीच्या सभापतीपदी वर्णीही लागली. भाजपवासी असतानाही मनोज कोतकर हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जात होते.

अहमदनगर महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अंतर्गत वाद मिटवून एकत्र आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याची भूमिका बजावली. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यातही याबाबत चर्चा घडवून नगर मधील अंतर्गत वादाला पूर्णविराम दिला. अहमदनगर पालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली. शिवसेनेच्या योगीराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मागे घेण्यात आला.

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

शिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी, अहमदनगरमधील राजकीय खेळीनंतर भाजपची मनोज कोतकरांना नोटीस

(Shivsainik writes letter to CM Uddhav Thackeray asking to review Ahmednagar Politics)