शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सामिल, संजय राऊतांकडून बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा फोटो पोस्ट करत निशाणा

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत बंडखोरांवर निशाणा साधलाय.

शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सामिल, संजय राऊतांकडून बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा फोटो पोस्ट करत निशाणा
बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (फाईल फोटो)
Image Credit source: ANI
| Updated on: Jul 19, 2022 | 5:55 PM

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेले. त्यानंतर आता शिवसेनेचे 12 खासदारही शिंदे गटात सहभागी झाले आहेत. इतकंच नाही तर या 12 खासदारांनी आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. तसंच आपला वेगळा गट स्थापन करण्यास परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केलीय. तसंच आपल्या गटाला वेगळी जागा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत बंडखोरांवर निशाणा साधलाय.

संजय राऊत यांनी आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलाय. पीठ से निकले.. खंजरों को गिना जब, ठीक उतनेही थे..
जित्नोंको गले लगाया था..! जय महाराष्ट्र!, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलंय.

महाराष्ट्र पुरात बुडत असताना मुख्यमंत्री दिल्लीत काय करतायत?

महाराष्ट्र पुरात बुडत असताना मुख्यमंत्री दिल्लीत काय करत आहेत, असा सवालही संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. शिवसेनेतील बंडखोरांवर टीका करताना संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यानंतरही खासदार शिवसेनेत थांबले का, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. हे सरकार कधीही कोसळू शकते असे सांगत सर्व संकटांना तोंड देण्यास शिवसेना समर्थ आहे. पुन्हा एकदा शिवसेना पूर्ण ताकदीनिशी समोर येईल, असंही राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्याची भेट अन् सत्कार

कालपर्यंत शिवसेनेत असलेले खासदार आता शिंदे गटात सहभागी झाले आहे. शिवसेनेतील 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केवळ भेटच घेतली नाहीतर त्यांचा सत्कारही केला आहे. मंगळवारी याच 12 खासदारांना घेऊन मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान, खासदारांच्या वतीनेही या निर्णयामागचे कारण समोर येईल असा आशावाद आहे. यामध्ये भावना गवळी, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, प्रताप जाधव, कृपाल तुमाणे, हेमंत पाटील, श्रीकांत शिंदे यांचा समावेश होता.