पंतप्रधान मोदी राजकारणातून निवृत्त झाल्यास, मीही राजकारण सोडेन – स्मृती इराणी

पुणे : ‘ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणातून निवृत्त होतील, त्यावेळी मी पण राजकारण सोडेन’, असे वक्तव्य केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केलं. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यासाठी सर्व पक्षाचे नेते हे आपल्या पक्षाच्या प्रचारात लागले आहेत. त्यातच वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या आज पुण्यात पोहोचल्या. येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी इतर विरोधी […]

पंतप्रधान मोदी राजकारणातून निवृत्त झाल्यास, मीही राजकारण सोडेन - स्मृती इराणी
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:30 PM

पुणे : ‘ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणातून निवृत्त होतील, त्यावेळी मी पण राजकारण सोडेन’, असे वक्तव्य केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केलं. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यासाठी सर्व पक्षाचे नेते हे आपल्या पक्षाच्या प्रचारात लागले आहेत. त्यातच वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या आज पुण्यात पोहोचल्या. येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी इतर विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवली. तर दुसरीकडे त्यांनी मोदी जेव्हा राजकारणातून निवृत्त होतील, तेव्हा मी देखील राजकारण सोडेल, अशी ग्वाही दिली.

स्मृती इराणी या पंतप्रधान मोदींचा खूप आदर करतात, तसे त्यांच्या प्रत्येक भाषणात दिसून येते. त्या नेहमीच आपल्या भाषणांमध्ये मोदी कशाप्रकारे एक उत्कृष्ट पंतप्रधान आहेत, ते कशाप्रकारे भाजपच्या नेत्यांना मार्गदर्शन करत असतात याबाबत सांगतात. इतकंच नाही तर अनेकदा त्यांनी मोदींवर टीका करणाऱ्यांवर हल्लाबोलही केला आहे. कित्येकदा त्या राहुल गांधींवरही टीका करतात. त्यातच आता स्मृती इराणींनी मोदी निवृत्त झाल्यास त्याही राजकारणातून निवृत्त होतील, असे सांगितले आहे.

या कार्यक्रमादरम्यान स्मृती इराणींनी पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नवनियुक्त झालेल्या प्रियांका गांधी यांच्यावरही टीका केली. ‘प्रियांका गांधी यांनी गांधी आडनाव न लावता वाड्रा आडनाव लावून राजकारणात यायला हवं होतं’, असे म्हणत स्मृती इराणींनी प्रियांका गांधींवर टीका केली. तसेच ‘मागच्यावेळीही हत्ती सायकलवर बसला होता, त्यावेळी सायकल पंक्चर झाली होती’, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे अखिलेश-मायावती यांच्या महाआघाडीवर टीका केली.

सध्या स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग खातं आहे. याआधी त्या मनुष्यबळ विकास मंत्री होत्या. त्यांनी 2003 साली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2004 साली त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. तर 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधी विरुद्ध लढल्या.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us