मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे सात निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात पुणे मेट्रो, नवी मुंबईत तिरुपती देवस्थानला (Tirupati Devasthan) मंदिर उभारण्यास भूखंड, काजू बोंडे आणि मोहफुलाच्या दारुबाबत महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानुसार पुणे महानगर मेट्रो (Pune Metropolitan Metro) रेल प्रकल्प टप्पा-1 ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-2ए) या 5.464 कि.मी. लांबी, 3 स्थानके असलेल्या रु. 3668.04 कोटी प्रकल्प पूर्णत्व खर्चाच्या पूर्णत: भूयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शहर पातळीवरील सुविधा (सिटी लेवल फॅसिलिटी) म्हणून विशेष प्रकल्पाअंतर्गत श्री व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी उलवे नोडमधील सेक्टर-12, भुखंड क्र.3 येथे जमीन देण्यात येणार आहे. त्यानुसार उलवे नोडमधील सेक्टर-12, भुखंड क्र.3 (एकूण क्षेत्र 40,400 चौ.मी.) 1.00 चटईक्षेत्र निर्देशांकासह भाडेपट्टयाने थेट वाटप करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
काजूबोंडे व मोहाफुलांच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणा-या मद्याचे वर्गीकरण हे 2005 पासून “देशी मद्य” असे करण्यात आले होते. या वर्गीकरणामुळे या मद्याच्या विपणनास व मुल्यवृद्धीस मर्यादा येत होत्या. त्यामुळे काजूबोंडे, मोहाफुले या पदार्थांसह स्थानिकरित्या उत्पादित होणाऱ्या फळे,फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून जे मद्य तयार केले जाईल त्यास ‘देशी मद्य’ याऐवजी ‘विदेशी मद्य’ असा दर्जा देण्यास मान्यता देण्यात येत आहे. अशा मद्यार्कापासून निर्मित होणा-या मद्यास “स्थानिक मद्य” असे संबोधण्यात येईल.
काजूबोंडे, मोहाफुले यासह स्थानिकरित्या उपलब्ध होणारे फळे-फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून पेय मद्य निर्मिती होईल. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये वाया जाणाऱ्या व नाशवंत अशा उत्पादनांचा वापर होऊन, त्यांची मुल्यवृद्धी होईल. याचा फळे, फुले उत्पादकांना लाभ होणार आहे. याशिवाय, एक स्वतंत्र उद्योग निर्माण होऊन राज्यात रोजगार निर्मिती बरोबरच महसूलात वाढ अपेक्षित आहे.
इतर बातम्या :