“औरंगजेबला पत्र लिहून शिवरायांनी 5 वेळा माफी मागितली”, भाजप प्रवक्त्याचं वादग्रस्त वक्तव्य

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आहे.

औरंगजेबला पत्र लिहून शिवरायांनी 5 वेळा माफी मागितली, भाजप प्रवक्त्याचं वादग्रस्त वक्तव्य
| Updated on: Nov 20, 2022 | 12:09 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) , इतिहास आणि वादग्रस्त वक्तव्य यामुळे महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता आणखी एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होतेय. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आहे.

सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले?

“औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली”, असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

सुधांशू त्रिवेदी यांचं हे जुनं विधान आहे. आजतक या वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलंय. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड चर्चेत आहे. त्रिवेदी यांच्या या विधानावर जोरदार टीका होतेय.

राऊतांकडून निषेध

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाला पत्र लिहून माफी मागितली, असं म्हणत सुधांशू त्रिवेदींनी शिवरायांचा अपमान केला. त्याच भाजपच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेत बसता. सतत स्वाभिमानाची भाषा बोलणारे शिंदे आता गप्प का? शिवरायांचा अपमान तुम्ही सहन कसा काय करू शकता?, असं राऊत म्हणालेत.

आव्हाडांचं ट्विट

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही त्रिवेदी यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती असा बोलणारा भाजप प्रवक्ता ठार वेडाच असू शकतो, असं आव्हाड म्हणालेत.

सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानानंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात येतोय.