भाजप बेसावध, ससा-कासवाच्या गोष्टीप्रमाणे पदवीधरमध्ये जिंकून येण्याचा आभास : मुनगंटीवार

| Updated on: Dec 04, 2020 | 12:03 PM

बेसावध राहिल्यामुळे निकालात बदल दिसला, कुठे कमी पडलो याचं विश्लेषण करु, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले

भाजप बेसावध, ससा-कासवाच्या गोष्टीप्रमाणे पदवीधरमध्ये जिंकून येण्याचा आभास : मुनगंटीवार
Follow us on

मुंबई : विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Graduate and Teachers Constituency Election Result) भाजपला मोठा हादरा बसला. ‘जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारलं याऐवजी भाजप बेसावध राहिली, असं म्हणणं योग्य ठरेल. ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखं आपण पदवीधरमध्ये जिंकून येतो, हा आभास होता’ असं मत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केलं. (Sudhir Mungantiwar says BJP was relax in Vidhan Parishad Graduate and Teachers Constituency Election)

‘महाविकास आघाडीला मतदारांनी स्वीकारलं, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण ही सार्वत्रिक निवडणूक नाही. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या जागा होत्या, हे खरं आहे. त्या गमावणं हे राजकीय दृष्टीने चिंतनीय आहे. त्याचं चिंतन केलं जाईल. आम्ही बेसावध राहिलो, त्यामुळे निकालात बदल दिसला, आम्ही कुठे कमी पडलो त्याचं विश्लेषण करु, पण भाजपची पिछेहाट अजिबात नाही. ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखं आपण पदवीधरमध्ये जिंकून येतो, हा आभास होता’ असं मुनगंटीवारांनी मान्य केलं.

‘जे उमेदवार सातत्याने दोन अडीच वर्ष काम करत गेले, नागपूर किंवा पुण्याचे, त्यांना मोठं यश मिळालं. पदवीधर हा हक्काचा मतदारसंघ मानला जातो, कारण तिथे भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पदवीधरांची नोंदणी करायचे. ज्यांना उमेदवारी हवी होती, त्या काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दोन अडीच वर्ष कामं सुरु ठेवली. काँग्रेसमध्ये नेहमीच कापाकापी असते. मात्र यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीने ज्यांनी काम केलं त्यांना तिकीट दिलं. भाजपचा हा मोठा पराभव आहे, हे माझं व्यक्तिगत मत आहे, त्याचं विश्लेषण होईलच. कारण विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही या सूत्राने आम्ही काम करत असतो’ अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप गाफील नव्हतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर 6-0 ने निवडणूक मारणार, असा दावा करत होते. मग तुमचे 50 वर्षांचे गड उद्ध्वस्त का झाले, मतदारांनी गृहित धरु नका हा संदेश दिला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

“ऑपरेशन लोटस किंवा सत्तांतर होणार, असा दावा मी किंवा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कधीच केला नाही. हे सरकार अस्थिर आहे, पण बाहेरुन पडेल असं कोणीही म्हणत नाही. आम्ही सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत नाही. मात्र देशात अशी सरकारं कुठेही टिकली नाहीत, हा इतिहास आहे. काँग्रेसने पाठिंबा दिलेलं एकही सरकार टिकलेलं नाही” असा घणाघातही मुनगंटीवारांनी केला.

संबंधित बातम्या :

‘चंद्रकांत पाटील यांनी आता बोलघेवडेपणा बंद करावा’, विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांतदादांना टोला

चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा, पुणे पदवीधर मतदारसंघ खेचून आणताच राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांचा टोला

तीन पक्षांच्या आघाडीमुळे समीकरणं बदलली, ऑपरेशन लोटस बारगळणार?; भाजपची डोकेदुखी वाढली

(Sudhir Mungantiwar says BJP was relax in Vidhan Parishad Graduate and Teachers Constituency Election)